लातूर ः ‘कोरोना’मुळे सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे घरात असलेला शेतमाल बाजारात नेता येईना, शेतात असलेले पीक काढता येईना, अशा कोंडीत शेतकरी सापडला आहे. अशातच पूर्वमोसमी पावसाने या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे औराद शहाजनी (ता. निलंगा) परिसरात शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथेही फटका बसला आहे. गारा, वादळी वारे व त्यात पाऊस यामुळे फळपिके, भाजीपाला तसेच रब्बी ज्वारीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत. रविवारी (ता. १९) प्रशासनाच्या वतीने नुकसानीची पाहणी सुरू करण्यात आली आहे.
या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेली गहू, ज्वारी, हरभरा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच फळबागा आणि भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. अगोदरच ‘कोरोना’मुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतातील पिके काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. औराद शहाजनी परिसरात सुमारे दोनशे एकरवरचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. या पावसाचा फटका किल्लारी (ता. औसा) परिसरालाही बसला आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. औराद शहाजनी परिसरात शनिवारी ५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रविवारी प्रशासनाच्या वतीने औराद शहाजनीसह ज्या-ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.