मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुण्यात पशूधन, फळपिकांचे नुकसान 

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.१) झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे आणि विशेषतः नगदी पिकांबरोबरच मोठ्या प्रमाणावर पशुधन मृत्युमुखी पडल्याने पशुपालक आणि मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे.
Damage to livestock and fruits in Pune due to post-monsoon rains
Damage to livestock and fruits in Pune due to post-monsoon rains

पुणे ः जिल्ह्यात बुधवारी (ता.१) झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे आणि विशेषतः नगदी पिकांबरोबरच मोठ्या प्रमाणावर पशुधन मृत्युमुखी पडल्याने पशुपालक आणि मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध पिकांमध्ये प्रामुख्याने द्राक्ष, कांदा पिकांचा समावेश असून, उसाच्या शेतात पाणी साठल्याने ऊस तोडणी ठप्प झाली आहे. तर ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्या पावसाने भिजल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.  जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड आणि जुन्नर तालुक्यात द्राक्षाचा हंगाम सुरु होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीत झालेल्या पावसाने द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे द्राक्षघड भिजल्याने कूज होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर बागेत पाणी साठल्याने देखील नुकसान वाढीची भीती शेतकऱ्यांना आहे. तर आता बुरशी, फळकूज आणि मणी क्रॅकिंगच्या भीतीने फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तर निर्यातक्षम बागांना मोठा फटका बसला आहे.  जिल्ह्यात कांद्याचे देखील मोठे नुकसान झाले असून, नुकत्याच झालेल्या कांदा लागवडीमध्ये पाणी साचल्याने रोपांची कूज होण्याची भीती व्यक्त होत आहे. रब्बीच्या पिकांना हा पाऊस दिलासादायक असला तरी नगदी पिकांच्या आणि पशुधनाच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ढगाळ वातावरण व अवकाळीमुळे औषध फवारणीच्या खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. पक्व होण्याच्या स्थितीमधील द्राक्षे क्रॅकिंग झाली आहेत. फ्लॉवरिंग स्थितीमधील द्राक्षाचा मोहर कुजला व गळला आहे. या हंगामातील सर्वाधिक नुकसान बुधवारच्या पावसाने केले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बोरी मधील शेतकरी मल्हारी शिंदे यांनी केली आहे. 

प्रतिक्रिया 

गेल्या काही वर्षांत अनेकदा नुकसान होऊनही शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ झालेला नाही, कारण शासन महसूलामध्ये असलेल्या हवामान केंद्राचा हवामानाचा अंदाज विमा कंपनीला कळवते. हवामान केंद्राच्या ठिकाणी पाऊस झालेला नसतो, मात्र गावात पाऊस झालेला असतो अशावेळी कृषी विभागामार्फत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी.  - दीपक कोकणे, द्राक्ष उत्पादक, गोळेगाव, ता. जुन्नर 

प्रतिक्रिया  दोन वर्षांपासून कोरोनामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षीत दर मिळाला नाही. हवामानातील बदलामुळे अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  - मोहन दुधाळ, शेतकरी, शेळगाव, ता. इंदापूर 

साताऱ्यात दुसऱ्या दिवशी पाऊस 

सातारा ः जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मध्यम ते हलका स्वरुपात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात ५.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात बुधवारी पावसाने कहर केल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र शेतातीतल बहुतांशी कामे बंद ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शुक्रवारी पावसाने दुपारपर्यंत जवळपास विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता. पावसाचा जोर वाढत तसतसे शेतीचे नुकसानीचा आकडा फुगत चालला असल्याचे शेतकरी सांगत आहे. सातारा, कऱ्हाड, जावळी तालुक्यात शुक्रवारी पावसाचा जोर वाढला आहे. ऊस गाळप किमान चार ते पाच दिवस बंद ठेवावी लागण्याची शक्यता आहे. सलग पाऊस सुरू असल्याने शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याचे प्रमाण वाढत चालेले आहे. स्ट्रॅाबेरी, द्राक्ष, रब्बी ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांचे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com