पुणे : नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे पंचनामे होईनात

नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे पंचनामे होईनात
नुकसानग्रस्त भाजीपाला पिकांचे पंचनामे होईनात

पुणे ः मॉन्सुनोत्तर पावसामुळे पुणे विभागात नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. परिणामी, भाजीपाला उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, सरकारने ठरावीक पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने भाजीपाला पिकांचे पंचनामे होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने भाजीपाला पिकांचेही तातडीने पंचनामे करण्याची मागणी पुढे येत आहे.  

काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे मेथी, वांगे, पालक, कोथिंबीर, भेंडी, टोमॅटो आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे विभागात ५१ तालुके बाधित असून, एकूण एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये भाजीपाला पिकांचाही समावेश असून त्यांचे नुकसान झाले. 

सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यातील काही नुकसानग्रस्त गावांना वरिष्ठ अधिकारी भेटी देत आहेत. मात्र, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होऊनही याकडे प्रशासन विभागाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे क्षेत्र कमी दिसत असले तरी गेल्या महिन्यात सांगली, कोल्हापूर, सातारा भागात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विभागात झालेले एकूणच दोन ते तीन महिन्यांत नुकसान झालेले क्षेत्र मोठे आहे.

अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे म्हणाले, की गेल्या दोन ते तीन महिन्यांत झालेल्या सलग पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, बटाटा या पिकांचे मोठे क्षेत्र आहे. याशिवाय मेथी, कोथिंबीर, शेपू, भेंडी, वांगे, कारले या पिकांचेही नुकसान झाले. नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा फवारणी खर्च वाढला असून भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे; परंतु शासन करीत असलेल्या पंचनाम्यामध्ये भाजीपाला पिकाला प्राधान्य देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी पंचनाम्यापासून वंचित आहे.

माझ्याकडे एकूण सहा एकर शेती आहे. त्यापैकी बटाटे दोन एकर, एक एकर कोबी, सोयाबीन दीड एकर, अर्धा-पाऊण एकर कांदारोपे होती. पावसामुळे जवळपास सर्वच पिकांचे नुकसान झाले. सरकारने सोयाबीनचे पंचनामे केले. बटाटे, कोबी, कांदारोपे यांची पाहणी केली; परंतु पंचनामे केले नाहीत. त्यामुळे लवकरच पंचनामे करावेत, अशी आमची मागणी आहे. - निवृत्ती बडे, शेतकरी, तांदळी, ता. जुन्नर, जि. पुणे.

जुन्नर, आंबेगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीची पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पाहणी केली होती. त्यांच्याकडेही आम्ही भाजीपाला पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. परंतु, त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.   - श्रीराम गाढवे, अध्यक्ष, अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक संघ, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com