सांगली : महापुरामुळे नुकसानग्रस्त कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील २७ हजार ९४२ शेतकऱ्यांना १७६ कोटीचे कर्ज माफ होणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतीला महापुराचा फटका बसला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महापुराने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. ऊस, केळी, हळद या पिकांची वाट लागली. दहा-बारा दिवस ही पिके पाण्याखाली होती. ज्या ठिकाणी महापुराचा फटका बसला नाही. तेथील खरीप पिके अतिवृष्टीमुळे कुजली. सततच्या पावसाने उसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला. त्याचे मोठे नुकसान झाले. महापूर बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करताना बुडालेल्या पिकावरील कर्जाच्या माफीची घोषणा अध्यादेशाद्वारे तत्कालीन सरकारने केली.
कृषी विभागाने अतिवृष्टी बाधित शेतीच्या पंचनाम्यांची मोहीम राबविली. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने जिल्हा बॅंक आणि राष्ट्रीयकृत बॅंकेसह अन्य बॅंकेकडून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची यादी मागविली. त्यानंतर ही यादी तपासण्यात आली. त्याचा अहवाल जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शासनाकडे सादर केला.
वास्तविक, लवकरच पंचनामे होऊन तातडीने अहवाल सादर करणे आवश्यक होते. मात्र, त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे महापुरातील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब लागला. गेल्या आठवड्यात शासनाने महापुरातील कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.
पूरबाधित कर्जमाफी दृष्टिक्षेप
बॅंक | शेतकरी | रक्कम (कोटीत) |
जिल्हा मध्यवर्ती बॅंक | २२,५३७ | १०५.२१ |
राष्ट्रीयकृत आणि अन्य बॅंका | ५,३६९ | ७१.५० |
एकूण | २७,९४२ | १७६.७१ |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.