तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्री

हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. संकट अजून टळलेले नाही. त्यामुळं घाई-गडबडीत काही निर्णय घेणं योग्य होणार नाही.
cm
cm

सोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. संकट अजून टळलेले नाही. त्यामुळं घाई-गडबडीत काही निर्णय घेणं योग्य होणार नाही. सध्या पंचनामे सुरु आहेत. नुकसानीचा आढावाही घेतला जातो आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता.१९) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.   मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या अक्कलकोट तालुक्‍यातील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर सोलापुरात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.   मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की हा परतीचा पाऊस आहे. किती आणि कसा पडेल, हे कोणीच सांगू शकणार नाही. प्रशासनाकडून इथल्या परिस्थितीची माहिती मी घेतली. सातत्याने त्यांच्याशी माझा संपर्क होता. आज इथे आलो, उद्या आणखी फिरणार आहे. हे संकट डोंगराएवढे आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देणं, दिलासा देणं माझं काम आहे.  ‘‘यापुढेही संकट टळलेले नाही. हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्या परिस्थितीत काय उपाययोजना करायची, याच्या सूचना दिलेल्या आहेत.  प्राणहानी, जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. सध्या सगळीकडे पंचनामे सुरु आहेत. माहिती घेतो आहोत. मध्यंतरी निसर्ग चक्रीवादळाने कोकणात अतिवृष्टी झाली, पूर्वविदर्भातही अशीच परिस्थिती ओढावली. आता सोलापूर आणि पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यावर हे संकट आलं आहे. पण घाईगडबडीने काही निर्णय घेऊन मदत देण्यापेक्षा शेतकऱ्यांचे दुःख जाणून, त्याला मदत करायची आहे,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  पंतप्रधानांनी मदतीचे आश्‍वासन दिलंय राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारीच मला स्वतःहून फोन करुन विचारणा केली आहे. चिंता करु नका, आपल्याला आवश्‍यक ती मदत देऊ, असे आश्‍वासनही त्यांनी दिलं असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. राजकारण करु नये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची मदत कधी मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे, याकडे लक्ष वेधता कोणीही राजकारण करु नये, राज्याला मदतीची गरज असेल, तर सर्वांनी मिळून केंद्राला मदत मागितली पाहिजे. पण विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी आलेलो नाही. मला फक्त शेतकऱ्यांना धीर द्यायचा आहे, असे उत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com