सोलापूर ः उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले. पण जोपर्यंत यासंबंधीचा लेखी आदेश निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना आणि उजनी धरण बचाव संघर्ष समितीने घेतल्याने पेच निर्माण झाला होता. पण अखेरीस गुरुवारी (ता. २७) यासंबंधीचा लेखी आदेश काढण्यात आला.
राज्याच्या जलसंपदा विभागाने २२ एप्रिल २१ रोजी उजनी जलाशयात बिगर सिंचनाचे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना शेटफळगढे येथे उपसा करून मुठा उजव्या कालव्यात टाकण्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. यावरून सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला. गेल्या महिनाभरापासून या प्रश्नावर शेतकरी संघटना आणि उजनी धरण बचाव संघर्ष समितीने आक्रमक होत आंदोलन सुरू केले होते. या वाढत्या विरोधानंतर जलसंपदा मंत्री पाटील यांनी हा निर्णय रद्द करत असल्याचे जाहीर केले. मात्र लेखी आदेश काढला नव्हता. त्यामुळे लेखी आदेश निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जनहित शेतकरी संघटनेने उजनी धरणावरच धरणे आंदोलन सुरू केले होते.
तसेच जलसंपदा मंत्र्यांचा पुतळा जाळून बोंबाबोंब आंदोलन केले. त्याशिवाय उपरी, पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा या ठिकाणीही टायर पेटवून, रास्ता-रोको आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले. कालच बारामती येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानासमोरही आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. गुरुवारी (ता. २७) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर दीपक भोसले, माउली हळणवर, अतुल खुपसे यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. या सर्व पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांनी आज २१ एप्रिलचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचा लेखी आदेश काढला. त्यामुळे या विषयावर आता पडदा पडला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.