जळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार आहे. एकट्या नंदुरबारात पाऊस लांबल्याने सुमारे २० ते २२ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. खानदेशात सोयाबीन पेरणी सुमारे ३० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज आहे. नेमके आकडे पुढील आठवड्यात स्पष्ट होतील.
खानदेशात जळगाव जिल्ह्यात पाऊसमान बरे आहे. धुळ्यात साक्री, धुळे व शिरपुरात पाऊसमान बरे आहे. पण धुळ्यातील शिंदखेडा व नंदुरबारमधील शहादा, नवापूर, नंदुरबार, तळोदा भागात हवा तसा पाऊस नाही. नंदुरबारात तर सरासरीच्या फक्त ३० टक्के पाऊस झाला आहे. तेथे आता ताग, बाजरी, मका, तूर पेरणीचे आवाहन कृषी विभाग करीत आहे. पण अद्यापही पाऊस नसल्याने पेरणी रखडली आहे. आता शहादा, तळोदा, नवापूर भागातील अनेक शेतकरी क्षेत्र नापेर ठेवण्याचे नियोजन करीत आहेत. पुढे रब्बीतील पिके घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात फक्त ६० टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. यातही अनेकांना पिके मोडावी लागली आहेत. कारण पेरणीनंतर पावसाचा खंड होता. खानदेशात ९ ते १२ जुलैदरम्यान काही भागात पाऊस झाला. पण नंदुरबारात अपवाद वगळता पाऊस नव्हता. फक्त ढगाळ वातावरण व भुरभुर पाऊस, अशी स्थिती आहे.
नापेर क्षेत्र ७५ हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता
जोरदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. जळगाव जिल्ह्यातही जळगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा भागात पाऊस हवा तसा नाही. यामुळे खानदेशात सोयाबीनची पेरणीदेखील घटली आहे. सोयाबीनची पेरणी सुमारे ४० हजार हेक्टरवर अपेक्षित होती. नंदुरबारात शहदा तालुक्यात अनेकांनी सोयाबीनचे बियाणे पावसाच्या लहरीपणामुळे विक्रेत्यांना परत केले. खानदेशातील नापेर क्षेत्रही सुमारे ७० ते ७५ हजार हेक्टरवर जाणार आहे. या क्षेत्रात चांगला पाऊस आल्यास पुढे रब्बीमध्ये कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीची पेरणी होऊ शकेल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.