सातारा जिल्ह्यात आडसाली ऊस लागवड क्षेत्रात घट

सातारा जिल्ह्यात आडसाली ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट
सातारा जिल्ह्यात आडसाली ऊस लागवडीच्या क्षेत्रात घट

सातारा : जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेमध्ये आडसाली हंगामात सुमारे दहा हजार हेक्‍टरने घट झाली असल्याचा अंदाज झाला व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामात ऊस कमी पडणार असल्याने साखरेच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. आडसाली ऊस लागवडीच्या काळात संततधार तसेच अधूनमधून मुसळधार पाऊस झाल्याने आडसाली लागवड करता आली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या वाढत असून, सध्या जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या १६ वर गेली आहे. मात्र, उसाच्या क्षेत्रात घट होत आहे. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात आडसाली हंगामात २३ हजार ९४ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. तर २०१८-१९ मध्ये १९ हजार २३७ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. यावर्षी मात्र आडसाली लागवडी काळात संततधार व अधूनमधून मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना ऊस लागवड करता आलेली नाही. यामुळे आ़डसालीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. सध्या कृषी विभागाकडे दोन हजार ९५८ हेक्टर आडसाली लागवड झाल्याची नोंद आहे.

सततच्या पावसामुळे काही तालुक्यातील ऊस लागवडीचे अहवालही करण्याचे काम अद्यापही कृषी विभागाचे सुरू आहे. तरी एकूण परिस्थिती व आकडेवारी बघता किमान दहा हजार हेक्टरने आडसाली ऊस लागवडीत घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हंगाम सुरू होताना आडसाली हंगामातील ऊस चांगला साखर उतारा येण्यासाठी फायदेशीर ठरत असतो. मात्र, पुढील हंगामात आडसाली उसाचे क्षेत्र कमी झाल्याने साखर उताऱ्यात घट होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सततच्या पावसामुळे आडसाली हंगामात इच्छा असतानाही शेतकऱ्यांना लागवडी करता आलेल्या नाहीत. आणि ज्या शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत, त्या उसाची अपेक्षित फुटवे व वाढ झालेली नाही.

मागील दोन वर्षांपूर्वी आडसाली ऊस हा शेतकऱ्यांनाही उत्पादन देणारा असतानाही शेतकऱ्यांकडून क्षेत्र कमी केले जात आहे. याचे प्रमुख कारण सरासरी पावणेदोन ते दोन वर्षे ऊस शेतात राहतो. यामुळे उत्पादन खर्चात होणाऱ्या वाढीबरोबर अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचा शेतकऱ्यांना अनुभव येत आहे. या हंगामात मात्र पावसाने चित्र बदलून टाकले आहे. सध्या दोन हजार ९५८ हेक्टर लागवडीचे क्षेत्राची नोंद असून यामध्ये चार ते पाच हजार हेक्टरची वाढ होऊ शकते. यामुळे जिल्ह्यात एकूण सात ते आठ हजार हेक्टर आडसाली ऊस लागवड झाल्याचा अंदाज आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत साधारणपणे दहा हजार हेक्टर घट होणार आहे. याचा परिणाम गाळप हंगामावर भीषण परिणाम होणार आहे. पूर्व हंगामी, सुरू तसेच खोडवा या हंगामातील उसावर पुढील हंगामाचे भवितव्य ठरणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com