कोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने अनेक धरणांतील पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या दोन दरवाजांतून ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यापैकी विद्युत विमोचकातून १४००, सांडव्यातून २८५६ असा एकूण ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
शनिवारी (ता. ८) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावड्यात सर्वाधिक ९७ मि.मी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात अद्यापही ८५ बंधारे पाण्याखाली आहेत. शनिवारी सकाळपर्यंत २३ गावांतील पाच हजार व्यक्तींनी स्थलांतर केले आहे.
दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणांचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. पंचगंगा नदीच्या पाण्यातही गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत एक फुटांनी घट झाली आहे. दुपारी बारा वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार राजाराम बंधारा पाणी पातळी ४४ फुट ४ इंच इतकी आहे. नदीच्या पात्रात घट होत असल्याने बंधारेही मोकळे होत आहेत.
गेल्या दोन दिवसांत सुमारे वीस बंधाऱ्यावरील पाणी हटल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक बंधाऱ्यांवर स्थानिक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यास पाणी येते.
बंधारे झाले खुले
सध्या केवळ धरणांतून सोडलेले पाणीच येत असल्याने पाण्याखाली गेलेले बंधारे खुले झाले आहेत. धरणक्षेत्राचा अपवाद वगळता जिल्ह्यात शनिवारी (ता.८) दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. पाणी कमी होऊ लागल्याने नदीकाठावरील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे चित्र होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.