खारभूमी बंधारा बांधण्याची मागणी

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावकोंडवाडी परिसरातील भागात खारे पाणी घुसत असल्यामुळे पन्नास एकर परिसरातील भातशेतीची जमीन नापिक बनली आहे.
खारभूमी बंधारा बांधण्याची मागणी Demand for construction of saline dam
खारभूमी बंधारा बांधण्याची मागणी Demand for construction of saline dam

पावस, जि. रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावकोंडवाडी परिसरातील भागात खारे पाणी घुसत असल्यामुळे पन्नास एकर परिसरातील भातशेतीची जमीन नापिक बनली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, तातडीने खारभूमी बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संस्थेच्या सभासदांनी केली आहे. 

रत्नागिरी तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या गावखडी या गावाला खाडीने वेढलेले आहे. त्यामुळे खाडीकिनारी गाव वसलेले असून, यातील गावकोंडवाडी व राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रूक या भागाला जोडणारा खारलँड बंधारा गेल्या अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आला. त्यामुळे या भागातील अनेक जमिनी सुपीक होत्या. परंतु मध्यंतरीच्या काळात कशेळी गावातील ग्रामस्थांनी हा खारलँड बंधारा फोडला होता. त्यामुळे भातशेती बरोबर अनेक दुबार पिके घेत येणारी जमीन खारपड झाली आहे.

कशेळी गावातील ग्रामस्थांना या बंधाऱ्यामुळे आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत असल्यामुळे वारंवार त्या बंधाऱ्याची झडपा तोडण्यात आली होती. गावखडीतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार झडपा बसवण्यात येत होती. परंतु पुन्हा ती फोडली जायची. खारे पाणी मोठ्या प्रमाणात गावकोंडवाडी परिसरात घुसत असल्यामुळे गेली अनेक वर्षे या परिसरातील सुमारे पन्नास एकर जागा नापिक बनली आहे. 

या पूर्वी या परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्री देव जगन्नाथ खारभूमी लाभार्थी सहकारी संस्था मर्यादित या नावाने सोसायटीची स्थापना केली होती. अनेक शेतकरी या परिसरात भातशेती, वरणा, पावटा, भाजीपाला आदी पिके घेत होते. या सोसायटीच्या माध्यमातून येथील शेतकरी त्या जागेच्या खारभूमी खात्याला दस्तही भरत आहेत.

या परिसरात घुसणारे खारे पाणी थांबविण्याकरिता खारभूमी बंधारा बांधण्याची मागणी केली जात आहे. सुमारे ६० कुटुंबांवर जमिनी भातशेती व इतर दुबार पिके घेण्यास नापिक बनल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या खारभूमी खात्याकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर निघत आहे. या करिता गावखडी-आडिवरे पंचक्रोशी तिलोरी कुणबी समाजाचे सल्लागार रामचंद्र जुवळे, जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत व बंदरविकास मंत्री असलम शेख यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्या ठिकाणी खारभूमी बंधारा बांधण्याकरिता पाठपुरावा करणार  असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com