पाणीटंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील रोपवाटिकांत ४५ हजार फळरोपे शिल्लक

पाऊस उशिरा झाल्याने फळबाग लागवडीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे खेड येथील रोपवाटिकेत सुमारे १० ते १५ हजार विविध फळांची रोपे शिल्लक आहेत. आता पाणीटंचाई सुरू झाल्याने फळबाग लागवड होण्याची शक्यता कमीच आहे. - एन. एस. भोसले, कृषी अधिकारी, जिल्हा फळ रोपवाटिका केंद्र, खेड.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : पुणे जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. त्याचा फटका रब्बी पेरण्यांसह फळबाग लागवडीला बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहा शासकीय रोपवाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोपे शिल्लक आहेत. जिल्ह्यात सुमारे ४५ हजार ५३५ रोपे अजूनही शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

यंदा वेळेवर व अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे त्याचा चांगलाच फटका पिकांना बसला आहे. फळबाग लागवडीसाठी पुणे जिल्ह्यात एकूण सहा शासकीय रोपवाटिका आहेत. त्यामध्ये विविध फळांची एक लाख १४ हजार ६२६ रोपे तयार करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास ६९ हजार १९१ रोपांची रोपवाटिकाधारकांनी विक्री केली आहे.

या रोपांची खरेदी करून चालू आर्थिक वर्षात उशिराने राबविण्यात आलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून २८० शेतकऱ्यांनी १६२.९९ हेक्टरवर फळबाग लागवड केली. यामध्ये सर्वाधिक फळबाग लागवड पुरंदर तालुक्यात झाली असून, १८८ शेतकऱ्यांनी सुमारे ९४.९४ हेक्टरवर नव्याने फळबाग लागवड केली आहे. त्यातच डिसेंबरपर्यंत अनेक शेतकरी फळबाग लागवड करत असले तरी त्यासाठी पुरेशा प्रमाणात परतीचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सप्टेंबरनंतरच फळबाग लागवड खोळंबल्याची स्थिती होती.

जिल्ह्यात शिरूर, बारामती, खेड, जुन्नर या तालुक्यांत एकूण सहा रोपवाटिका आहेत. शासनाच्या योजनेअंतर्गत आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, नारळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर आदी फळपिकांची लागवड करता येणार होती.

या योजनेअंतर्गत कोकणातील शेतकऱ्यांना कमाल दहा हेक्टर, तर उर्वरित विभागासाठी कमाल सहा हेक्टरपर्यंत लाभ घेता येणार होता. त्यासाठी किमान ४३,५९६ ते जास्तीत जास्त १,०९, ४८७ रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार होते. अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यांपैकी १ हजार २९८ लाभार्थ्यांना कृषी विभागाने पूर्वसंमती दिली. लागवड करण्यासाठी ८०९ लाभार्थ्यांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. परंतु पाणीटंचाईमुळे फळबाग लागवडी होतील की नाही याची शाश्वती कमी आहे, त्यामुळे जिल्ह्यात ४५ हजारांवर फळरोपे शिल्लक आहेत.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com