'सिंचन योजनांच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्या'

कृष्णा आणि वारणा नदीतून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात आहे. सध्या लवादाच्या निकषानुसार जास्त पाणी धरणांमध्ये असल्यामुळे ते कोणतीही मोजदाद न ठेवता समुद्राकडे जात आहे. शासनाने हेच पाणी दुष्काळग्रस्त भागात दिल्यास टंचाईवर होणारा वारेमाप खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आहे. - विठ्ठल चव्हाण, उमदी, ता. जत, जि. सांगली.
'सिंचन योजनांच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्या'
'सिंचन योजनांच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला द्या'

सांगली  : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत दमदार पाऊस झाला असला तरी, अद्याप दुष्काळग्रस्त भागात पाण्याची टंचाई कायम आहे. सध्या कृष्णा आणि वारणा नद्या पुरामुळे दुथडी भरून वाहत असून हे पाणी कर्नाटकात जात आहे. हे वाहून जाणारे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागात टंचाई निधीतून सोडण्यात यावे, अशी मागणी दुष्काळग्रस्त भागातून होते आहे.

जिल्ह्यातील सुमारे १३६ गावे, ८७२ वाड्यांना १५५ टॅंकरव्दारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. यंदा पावसाची सुरवात खूपच उशिरा झाली. जिल्ह्यात आतापर्यंत यंदाच्या हंगामात केवळ नऊ दिवसांतच सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस झाला आहे. सरासरी पावसाची आकडेवारी मोठी दिसत असली तरी वास्तविक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव पूर्व, मिरज पूर्व या भागांत पावसाचे सातत्य नव्हते. त्यामुळे जो पाऊस पडला त्याचा पाणी पातळी वाढण्यासाठी उपयोग झाला नाही. परिणामी, दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये अद्यापही पाण्याची टंचाई आहे.   पावसाला विलंब झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागात खरिपाच्या पेरण्या लांबल्या. थोडा बहुत पाऊस पडल्यावर जिल्ह्यात सुमारे ८५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या.

गतवर्षी ३ ऑगस्टपर्यंत सरासरी ११३.३ मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली होती, मात्र यंदा दुष्काळग्रस्त तालुक्यांसह ती अवघी ९०.४ मि.मी. आहे. सध्या कोयना आणि चांदोली धरणांच्या पाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. परिणामी, दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वारणा आणि कृष्णा दोन्ही नद्यांमधून वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागात सिंचन योजनांच्या माध्यमातून दिल्यास सध्या सुरू असणाऱ्या टॅँकरची संख्या कमी होईल, तसेच दुष्काळग्रस्त भागातील तलाव, बंधारे टंचाई निधीतून भरल्यास भविष्यात कराव्या लागणाऱ्या टंचाईवरील खर्चामध्ये बचत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात सोडण्याची मागणी होत आहे. याबाबत जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील मागणी करण्यात आली होती, मात्र वीजबिल भरायचे कुणी यावरून मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत मौन बाळगले होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com