कृषी कायदे मागे घ्या : राष्ट्रपतींकडे विरोधकांची मागणी

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. ९) सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. तीन कृषी कायदे,शेतकरी आंदोलनाविषयीच्या भावना राष्ट्रपतींकडे व्यक्त केल्या.
कायदे मागे घेण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
कायदे मागे घेण्याची राष्ट्रपतींकडे मागणी

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. ९) सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने तीन कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाविषयी आपल्या भावना राष्ट्रपतींकडे व्यक्त केल्या.

पाच सदस्यांच्या या शिष्टमंडळात काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, डीएमकेचे नेते टीआर बालू, भाकपचे सरचिटणीस डी, राजा, सीताराम येचुरी यांचा समावेश होता.  राष्ट्रपतींना भेटून बाहेर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने केलेले तीन कायदे मागे घेतले जावेत, अशी मागणी आम्ही राष्ट्रपतींकडे केली आहे. संसदेत चुकीच्या पद्धतीने कृषी कायदे करून शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळेच ते थंडीत आंदोलन करीत आहेत. आम्ही शांततामय मार्गाने निषेध करीत राहू.’’ भाकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले, ‘‘आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. कृषी कायदे आणि वीज सुधारणा विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे.’’  शरद पवार म्हणाले, ‘‘विरोधी पक्षांतील बहुतेक सर्वच पक्षांनी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. हे कायदे करताना सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही, त्यांना विश्‍वासात घेतले गेले नाही.’’

मोदी सरकारला हवी लोकशाहीपासून सुटका : राहुल गांधी ‘पंतप्रधान मोदी यांच्या सत्ताकाळातील सुधारणा म्हणजे चोरी आहे, त्यांना लोकशाहीपासून सुटका हवी आहे,’ अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केली आहे. अमिताभ कांत यांनी देशात प्रमाणापेक्षा जास्त लोकशाही असल्यामुळे सुधारणा करणे कठीण जात असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांचे ट्विट महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

आंदोलक शेतकऱ्याचा थंडीने मृत्यू  केंद्राने केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी सिंघू सीमेवर मागील दहा दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या एका ३२ वर्षीय आंदोलकाचा थंडीने मृत्यू झाला. अजय मोर, असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचा मृत्यू थंडीने झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत झोपलेल्या ठिकाणीच त्यांचा मृतदेह आढळून आला. मोर सोनीपतच्या गोहना येथील रहिवासी असून, गावातील शेतकऱ्यांसोबत मागील दहा दिवसांपासून ते आंदोलनात सक्रिय होते. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, पत्नी, वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.

देशात प्रमाणापेक्षा जास्त लोकशाही : अमिताभ कांत  नवी दिल्ली : ‘भारतात प्रमाणापेक्षा जास्त लोकशाही आहे. त्यामुळेच देशात कठोर सुधारणा करणे कठीण झाले आहे. देशाला प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी मोठ्या आणि कठोर सुधारणांची गरज आहे,’ असे स्पष्ट मत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. मंगळवारी (ता. ८) एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना अमिताभ कांत म्हणाले, ‘‘ केंद्र सरकारने पहिल्यांदाच खाण उद्योग, कोळसा उद्यागे, श्रम विभाग आणि कृषी क्षेत्रात मोठ्या आणि कठोर सुधारणा केल्या आहेत. आता राज्यांना समोर येऊन या सुधारणांना पुढे नेले पाहिजे. देशात प्रमाणापेक्षा जास्त लोकशाही असल्यामुळे कठोर आणि मोठ्या सुधारणा करणे अवघड जात आहे. या सुधारणा करण्यासाठी मजबूत राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे. अजून अशा अनेक सुधारणा करण्याची गरज आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com