आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेला मागणी

कच्ची साखर निर्यात
कच्ची साखर निर्यात

नवी दिल्ली : देशात साखरेचे दर कमी असल्यामुळे अतिरिक्त पुरवठ्याची स्थिती निर्माण होऊन केंद्राला निर्यातीसाठी कोटा पद्धती सुरू करावी लागली. मात्र कच्च्या साखरेला आंतराराष्‍ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे. चीनमधील रिफायनरींनी ३० हजार टन कच्ची साखर खरेदी केल्यानंतर परत ३० हजार टन साखर आयातीचे करार केले आहेत. मलेशियाने ४४ हजार टन खरेदी केली असून इंडोनेशियाकडून ३० हजार टन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली.  भारत हा साखर उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. २०१८-१९ च्या हंगामात विक्रमी १५० लाख टन अतिरिक्त साखर साठा आहे. साखरेचा भार कमी करण्यासाठी केंद्राने साखर कारखान्यांना या हंगामात ५० लाख टन साखर निर्यात अनिवार्य केली आहे. साखर निर्यातीला चालना मिळावी यासाठी इंडोनेशिया, मलेशिया, चीन, दक्षिण कोरिया आणि बांगलादेश या देशांच्या सरकारांबरोबर केंद्राने सराकर ते सरकार पातळीवर करार केले आहेत. केंद्र सरकारने निर्यातीसाठी साखर कारखान्यांना विविध सवलती आणि सुविधाही देऊ केल्या आहेत. गेल्या महिन्यात पाकिस्तानने चीनसोबत साखर निर्यातीचे करार केल्यानंतर भारतीय दूतावासाने हा  मुद्दा चीन सरकारकडे मांडून भारतीय साखर खरेदीबाबत सरकारच्या पातळीवर करार होण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना  महासंघ आणि ‘इस्मा’ या संघटना करार होणारी  साखर निर्यात करू शकणाऱ्या कारख्यान्यांचा शोध घेत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र किंवा उत्तर प्रदेश राज्यात निर्यातीच्या साखरेसाठी चाचपणी केली जाणार आहे. देशातील ऊस गाळप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ज्या साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे त्याच कारखान्यांना कच्ची साखर निर्मितीची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती साखर उद्योगाच्या सूत्रांनी दिली. मलेशियाकडून मोठी मागणी मलेशिया आणि भारत या दोन्ही सरकारांच्या पातळीवर करार झाल्यानंतर मलेशिया सरकारने भारताकडून ४४ हजार टन कच्ची साखर खरेदी केली आहे. सोबतच साखरेचे दर जागतिक पातळीवरील दराच्या पातळीवर व्यावहारिक असल्यास पुढील तीन वर्षांत ३० लाख टन साखर खरेदीसाठीची प्रक्रिया इंडोनेशिया देशाने सुरू केली आहे.    उत्पादन ३०७ लाख टन होणार  ‘इस्मा’ या साखर कारखानदारांच्या संघटनेने देशातील साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ‘‘यंदा साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.५ टक्के घट होणार आहे. २०१८-१९ मध्ये देशात ३०७ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यंदाचे उत्पादन हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असले तरीही आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे विक्रमी उत्पादन आहे,’’ असे ‘इस्मा’ने म्हटले आहे. आणखी निर्यातीचे करार भारताच्या कच्च्या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे. ७ मार्चपर्यंत २२ लाख टन साखर खरेदीचे करार झाले असून लवकरच निर्यातीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सोबतच म्यानमार देशाने साखर आयातीच्या बदल्यात कडधान्य निर्यातीचा प्रस्ताव भारतापुढे ठेवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com