पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढविण्याकरिता ३८ कोटी रुपयांचे अनुदानित बियाणे वाटण्यासाठी कृषी विभागाने मोहिमेला सुरुवात केली आहे.
रब्बी हंगामातील बियाणे वाटपाच्या नियोजनाचा आढावा कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतला. एका शेतकऱ्याला पाच एकर मर्यादेपर्यंत हरभरा बियाणे मिळणार आहे. हरभरा बियाण्यावर कृषी विभागाकडून यंदा प्रतिक्विंटल २५०० रुपये अनुदान दिले जात आहे.
‘‘कृषी विभागाकडून अनुदानावर वाटल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण हरभरा बियाण्याचा शेतकऱ्यांची लाभ घ्यावा. यामुळे उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी मदत होईल,’’ असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून प्रमाणित हरभरा बियाणे वितरणासाठी सोमवारपासून राज्यभर सुरू झालेली ही मोहीम २४ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील. यंदा भरपूर पावसामुळे जमिनीत उत्तम ओलावा असल्याने हरभरा पिकासाठी सर्वांत चांगली स्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे यंदा ३० लाख हेक्टरच्या पुढे हरभरा पेरला जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २६ लाख हेक्टरवर हरभऱ्या पेरा केला होता.
रब्बीत आता ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र हरभऱ्याकडून व्यापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणित बियाणे मिळवून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. यात पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी २०२, बीडीएनजीके ७९८ या वाणांचा समावेश आहे. किमान एक लाख ९७ हजार क्विंटल बियाण्यांचे वितरण केले जाईल. शेतकऱ्यांना यापैकी २३ हजार क्विंटल बियाणे पूर्णतः मोफत दिले जात आहे. ते पीक प्रात्यक्षिकांसाठी वापरले जाईल. उर्वरित बियाण्यांवर मात्र प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.