शेतीवरील अवलंबित्व कमी करण्याची गरजः शरद पवार

Afarm
Afarm

पुणे: शेतीखालील क्षेत्र कमी होत असताना, शेतीवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज आहे. यासाठी शेतीतील मर्यादित हातांना उत्तम काम देण्याच्या सूत्राचा अवलंब करीत, शेतीला पूरक जोडधंदा आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आता अफार्मने काम करावे, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. अफार्म संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी (ता. १) आयोजित ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी संस्थांची भूमिका’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन श्री. पवार  यांच्या हस्ते झाले. या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार श्रीनिवास पाटील, नवी दिल्लीच्या ‘वाणी’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जेटली, अफार्मचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी, संचालिका वसुधा सरदार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  श्री. पवार म्हणाले, ‘‘तरुण पिढी शेती क्षेत्र सोडत असून शेती क्षेत्राबाबत उदासीन असल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्यात वाढत्या उद्योगांमुळे शेतीखालील क्षेत्र कमी होत असताना शेतीवरील अवलंबित्व कमी होताना दिसत नाही, त्यामुळे शेतीवर किती जणांनी अवलंबून राहावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या चारही दिशांना शेती होती. मात्र आता या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर उद्योग धंदे उभे राहिले आहेत. तर शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. शेतीमधील मर्यादित हातांना उत्तम काम देण्याच्या सूत्राचा अवलंब करीत, पूरक जोडधंदा आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.’’ महसूलमंत्री थोरात म्हणाले, ‘‘ग्रामीण महाराष्‍ट्रात सध्या बेरोजगार तरुणांची सर्वात मोठी समस्या आहे. राज्य आणि राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या हातांचा कसा उपयोग करून घेता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच. मात्र सरकारच्या प्रयत्नांना अफार्मसारख्या सामाजिक संस्थांची साथ मिळण्याची अपेक्षा आहे.’’ खासदार पाटील म्हणाले, ‘‘सिक्कीमचा राज्यपाल म्हणून काम करत असताना, रासायनिक खते बाळगणे आणि वापरणे यावर बंदी करण्याचा कायदा करण्याची संधी मला मिळाली. यामुळे संपूर्ण सिक्कीम राज्य सेंद्रिय राज्य झाले असून, येथील भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. अफार्मसारख्या संस्थांनी केलेल्या जल आणि मृद संधारणाच्या कामामुळे शेतीला पाणी मिळू लागले आहे. तर कमीत कमी पाण्यावर १० एकरात ५० लाखांचे उत्पादन माण खटावसारख्या दुष्काळी तालुक्यांमध्ये शक्य झाले आहे. आता शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक आणि विक्रीची प्रभावी यंत्रणा उभारण्याचे काम अफार्मने करावे.’’ वाणीचे हर्ष जेटली म्हणाले, ‘‘भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचीदेखील सामाजिक संस्थेत नोंद होत असून, संस्थात्मक समाजसेवा आव्हानात्मक होत आहे. ही आव्हाने कायद्याचा कचाटा आणि बदलांच्या थिगळांमुळे वाढत आहेत. देशात ३० लाख सामाजिक संस्था आहेत. यांना येणारा पैसा, विविध उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या देणग्यांबाबत श्‍वेतपत्रिका निघण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांच्या कायद्याबाबत संसदेत आणि राज्यसभेत गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे.’’ या वेळी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या स्मरणिकेचे प्रकाशन आणि संस्थेच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तर विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक अफार्मचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत कोठडिया  यांनी केले. आभार वसुधा सरदार यांनी मानले. कामाची दिशा बदलावी अफार्म संस्थेने गेल्या ५० वर्षात पाणी आणि मृद संधारणावर मोठे काम उभे केले आहे. आता कामाची दिशा बदलावी लागणार आहे. यासाठी शेतीतून केवळ पीक काढणे यावर अवलंबून न राहता पीक पद्धतींमध्ये बदल करत, शेतीला जोडधंदा आणि प्रक्रिया उद्योगांसाठी अफार्मने योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com