नगर ः शेतातील सर्व प्रकारची कामे एकाच यंत्राने करता येतील अशा प्रकारचे यंत्र तयार करण्यासाठी विद्यापीठाने संशोधन करावे जेणेकरून लहान शेतकऱ्यांना त्याचा सर्वात मोठा फायदा होइल. नॅनो युरिया वापरासंबंधीच्या शिफारशी तसेच हरभरा या पिकाला खते देण्यासंबंधीच्या शिफारशी विद्यापीठाकडून मिळाल्या तर त्या शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर होतील. विद्यापीठाने उन्हाळी भुईमुगाच्या बियाण्याची कमतरता दूर करावी, अशी अपेक्षा कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी व्यक्त केली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची ऑनलाइन बैठक झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील होते. कृषी आयुक्त धीरजकुमार, विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कृषी संचालक विकास पाटील, सहसंचालक बसवराज बिराजदार, उमेश पाटील, संजीव पडवळ, अधिष्ठाता रसाळ, डॉ. प्रमोद रसाळ, संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण दिलीप झेंडे, कुलसचिव प्रमोद लहाळे, कृषी परिषदेचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. विठ्ठल शिर्के, महाबीज, अकोलाचे संचालक फुंडकर, श्री. आर. सी. जोशी उपस्थित होते.
महाबीज-विद्यापीठाने एकत्र काम करावे ः डॉ. पाटील कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, की शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठात काम करणारा प्रत्येक शास्त्रज्ञ अविरत प्रयत्न करत आहे. एक वाण तयार करण्यासाठी दोन-तीन वर्षाचा कालावधी लागतो. विद्यापीठाने आतापर्यंत प्रत्येक पिकात विक्रमी उत्पादन देणारे वाण विकसित केलेले आहेत. कमी मनुष्यबळ व पुरेशा आर्थिक पाठबळाअभावी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना संशोधन करताना अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही प्रत्येक पिकात जास्त उत्पादन देणारे वाण विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.