विठ्ठला, दुष्काळमुक्तीच्या कामात साथ दे : देवेंद्र फडणवीस

आषाढी वारी
आषाढी वारी

पंढरपूर ः  राज्यातल्या प्रत्येक गावातील एक तरी व्यक्ती पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेत असते. वारी आणि विठ्ठल म्हणजे सकारात्मक शक्तीचा आविष्कार आहे. लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक म्हणजे वारी आहे. हीच सकारात्मक शक्ती आम्हाला महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी आणि दुष्काळमुक्तीच्या कामात साथ देण्यासाठी मिळो, असे साकडे आपण विठ्ठलचरणी घातले, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १२) येथे सांगितले.  आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा शुक्रवारी पहाटे सव्वादोन वाजता मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कृषिमंत्री डॅा. अनिल बोंडे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पाणीपुरवठा राज्यमंत्री बबनराव लोणीकर, मंदिर समितीचे अध्यक्ष डॅा. अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथमहाराज औसेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंधरा-वीस दिवस चालत येतात, हा एक संस्कार आणि संस्कृती आहे. आमची संस्कृती अबाधित ठेवण्याचे काम याच संस्काराने केले. वारकऱ्यांच्या सोई-सुविधांसाठी शासन पहिल्यापासून सातत्याने काम करते आहे. पर्यावरणपूरक वारी, निर्मलवारी यांसारखे उपक्रम त्याचाच भाग आहेत. नमामि चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याला उशीर होतो आहे, पण या उपक्रमातून चंद्रभागेतील पाणी स्वच्छ आणि निर्मळ करण्याचा प्रयत्न आहे.  लातूरच्या शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान वारकरी प्रतिनिधी म्हणून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव तांडा येथील शेतकरी विठ्ठल चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाला. महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा आणि एक वर्षे मोफत प्रवासाचा एसटी बसचा पास देऊन चव्हाण दांपत्याचा सत्कार करण्यात आला. चव्हाण दांपत्य गेल्या ३९ वर्षांपासून पंढरपूरची वारी करतात. मुख्यमंत्र्यांबरोबर महापूजेचा मान मिळाल्याने आम्हाला खूपच आनंद झाला. गेल्या अनेक वर्षांच्या श्रद्धेचे फळ आम्हाला मिळाले. आमची वारी अखंडपणे अशीच राहू दे, शेतकऱ्यांना सुखी, समाधानी ठेव, अशी आमची प्रार्थना असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.    संतपीठासाठी शिर्डी देवस्थानची मदत  मंदिर समितीचे अध्यक्ष डॅा. अतुल भोसले यांनी गेल्या दोन वर्षांत मंदिर समितीने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मंदिर समितीचे उत्पन्न सध्या ३१ कोटींपर्यंत आहे. ते ५० कोटींपर्यंत नेण्याचे आणि त्या माध्यमातून वारकऱ्यांना अधिकाधिक सोई देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. संतपीठ हा आमचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी आहे. शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी त्यासाठी मदत करण्याचे मान्य केले आहे. किमान ५० कोटींची मदत ते करतील, अशी अपेक्षा डॉ. भोसले यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com