नैसर्गिक आपत्ती नियोजन व व्यवस्थापनाबद्दलची भूमिका यांचे ताळमेळ जुळवल्यास दुष्काळजन्य परिस्थितीतही जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून देता येतो. त्यासाठी नियोजनासोबतच विविध खाद्य व खाद्याचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. याकरिता पुढीलप्रमाणे उपलब्धतेनुसार उपाययोजना कराव्यात. युरिया प्रक्रिया
भात किंवा गहू काढणीनंतर गव्हाचे काड आणि भाताचा पेंढा शिल्लक राहतो. १०० किलो गव्हाचे काड किंवा तांदळाचा पेंढा स्वच्छ प्लॅस्टिकच्या कागदावर पसरवून घ्यावा. एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये साधरणतः ४०-५० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये २.० ते ३.० किलो युरिया मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण झारीच्या साह्याने सर्व गव्हाच्या काडावर किंवा भाताच्या पेंढ्यावर एकसमान शिंपडावे. द्रावण एकसमान पसरविण्यासाठी काड खाली वर करावे. प्लॅस्टिकचा कागद हवाविरहित बंद करावा. २१ दिवसांपर्यंत हवाबंद ठेवावा. २१ दिवसांनी या गव्हांड्यावर युरियाची प्रक्रिया पूर्ण होऊन त्याची पोषकता, पाचकता व रुचकरपणा वाढून प्रथिनांचे प्रमाणदेखील वाढते. प्रक्रिया केलेल्या गव्हांड्यासोबत थोडी ढेप अथवा हिरवा चारा मिसळून द्यावा. टीप युरिया प्रक्रिया तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. टीपः युरिया प्रक्रिया तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. दुय्यम घटकांचा खाद्य म्हणून वापर
साखर कारखान्यात उसाचा रस काढल्यावर बगॅस शिल्लक राहते. या बगॅसचा उपयोग पशुखाद्य म्हणून करता येतो. उसाचे वाढे पशुखाद्य म्हणून वापरता येते. ऊसाचे वाढे देताना त्यावर चुन्याची निवळी शिंपडून रात्रभर ठेऊन दुसऱ्या दिवशी जनावरांना प्रक्रिया केलेले वाढे खाऊ घातल्यास ऑक्झ्यॅलेट्सचे दुष्परिणाम टाळता येतात. उसाचे वाढे व इतर निकृष्ट चाऱ्याचा वापर होत असताना जनावरांना रोज ५०-६० ग्रॅम क्षार मिश्रण आणि ५० ग्रॅम कॅल्शियम द्यावे. टीपः उसाच्या वाढ्यामध्ये ऑक्झ्यॅलेट्स असते. ते जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमबरोबर बंध निर्माण करते त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते म्हणून खनिजमिश्रण खाऊ घालावे. झाडपाला व टाकाऊ पालेभाज्यांचा वापर
उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध नसतो. याला पर्याय म्हणून झाडपाला व टाकाऊ भाजीपाल्याचा पशुआहारात वापर करावा. याकरिता आंबा, वड, पिंपळ, बाभूळ, सुबाभूळ, अंजन, चिंच इत्यादी उपलब्ध झाडपाल्याचा वापर करावा. या झाडपाल्यामध्ये ६ ते २० टक्के प्रथिने, ०.५ ते २.५ टक्के कॅल्शियम आणि जीवनसत्त्व उपलब्ध असते. टाकाऊ भाजीपाल्यामध्ये साधरणतः पालक, मेथी, पानकोबी, फुलकोबी, गाजर, मुळा इत्यादींचा वापर करावा. कडबा किंवा कोणताही चारा देताना त्याची कुट्टी करूनच द्यावी. वाळलेला चारा देताना साधारणपणे ५० ग्रॅम मीठ पाण्यात विरघळून ८ ते १० किलो चाऱ्यावर शिंपडावे यामुळे चारा मऊ होऊन चविष्टपणा वाढतो. सर्व प्रकारच्या जनावरांना दररोज खुराकातून खनिज मिश्रण नियमितपणे द्यावे. बाराही महिने रानात चरायला जाणाऱ्या जनावरांच्या गव्हाणीत पूरक आहार म्हणून युरोमोल चाटण वीट टांगून ठेवावी. म्हणजे जनावरे हवी तेव्हा वीट चाटून अन्नद्रव्याची पूर्तता करून घेतात. ह्या चाटण वीटेमुळे जनावरांची भूक वाढते, चारा चांगला पचतो आणि उत्पादनात वाढ होते. युरोमोल चाटण वीट |
गव्हाचा भुसा | २५ टक्के |
सिमेंट | १० टक्के |
मीठ | ४ टक्के |
शेंगदाणा पेंड | १० टक्के |
खानिज मिश्रण | १ टक्के |
गुळाचे पाणी/मळी | ४० टक्के |
युरिया | १० टक्के |
संपर्कः डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४ (पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा ),