सध्याच्या वातावरणाचा विचार करता प्रत्येक ठिकाणी एकतर पाऊस झालेला आहे, किंवा ढगाळ वातावरण दिसून येत आहे. पावासाळी वातावरण व नुकत्याच झालेल्या पावसामुळे वाढलेली आर्द्रता यामुळे द्राक्ष बागेत काही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यादृष्टीने काही उपाययोजना करण्याची गरज आहे. कॅनोपी व्यवस्थापन
बऱ्याचशा बागेमध्ये या पूर्वी झालेल्या पावसामुळे आर्द्रता वाढलेली असून, ८० टक्क्यापर्यंत पोचली आहे. ही वाढलेल्या आर्द्रतेमुळे वेलीच्या वाढीचा जोमसुद्धा तितक्याच प्रमाणात वाढलेला दिसून येईल. परिणामी बागेत बगलफूटी जास्त प्रमाणात वाढतील. त्या सोबत शेंडाही तितक्याच प्रमाणात वाढेल. यामुळे कॅनोपी वाढून गर्दी निर्माण होईल. बऱ्याचशा बागेमध्ये गर्दी असलेल्या ठिकाणी डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. ज्या ठिकाणी शेंड्याकडील वाढ जास्त प्रमाणात दिसून येते, तिथे करपा रोगाचा (ॲन्थ्रक्नोज) प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. कॅनोपीच्या गर्दीमुळे बागेत आर्द्रता वाढली व ती डाऊनी मिल्ड्यूच्या रोगासाठी पोषक बनली. या वातावरणात फवारणी केल्यानंतर सुद्धा रोग नियंत्रण सहज शक्य होत नसल्याचे दिसून येते. त्याला कारण म्हणजेच ही दाट कॅनोपी होय. रोग नियंत्रणाच्या दृष्टीने बागेमध्ये यावेळी काटेकोरपणे सांभाळलेले कॅनोपी व्यवस्थापन फळछाटणीनंतर फायद्याचे ठरते. यावेळी रोगनियंत्रणाकरिता बरेच बागायतदार आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करत असल्याचे दिसून येते. या वेळी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर पुढील हंगामात या बुरशीनाशकांचा फार जास्त वापर करता येणार नाही. कारण त्यांचे अवशेष राहण्याची शक्यता असते. यावेळी मोकळी कॅनोपी करून त्या रोगाच्या वाढीकरिता पोषक असलेले वातावरण राहणार नाही, याची काळजी घ्यावी. डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव हा वेलीवर वाढलेल्या बगलफुटींमुळे जास्त प्रमाणात होतो. बगलफुटी काढून घेतल्यास मोकळी कॅनोपी झाल्यामुळे हा खेळती राहील व रोगाच्या प्रसारासाठी सूक्ष्म वातावरण तयार होणार नाही. यानंतर रोगनियंत्रणाकरिता शिफारशीत स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी करता येईल.डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणाकरिता पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस अॅसीड ४ ग्रॅम प्रती लीटर अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रती लीटर पाणी (टॅंक मिक्स) या प्रमाणे फवारणी केल्यास चांगले परिणाम मिळू शकतील. मोकळी कॅनोपी असल्यामुळे फवारणीचे कव्हरेजही चांगले होईल. रोगनियंत्रणास अडचण येणार नाही. डाऊनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी सीएए वर्गातील आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर टाळावा. ज्या बागेत कोवळ्या फूटी वाढत आहेत. येथे अचानक पाऊस झाल्यास दूसऱ्याच दिवशी तांबूस रंगाचे डाग पानावर दिसून येतील. त्यानंतर हेच डाग काडीवरही आढळून येतील. जास्त प्रादुर्भाव झालेल्या स्थितीत फुटीचा शेंडा जळलेला दिसेल. ही प्रादुर्भावित फूट आपल्या पानांच्या गरजेपेक्षा जास्त आहे. या काडीवर असलेला अॅन्थ्रॅक्नोज नियंत्रित करत बसल्यास बुरशीनाशकांचा खर्च वाढेल आणि हा रोग काडीमध्येही प्रवेश करण्याची शक्यता असेल. पुढील हंगामात याचे घडावरही परिणाम दिसून येतील. तेव्हा बागेत काडीवर १७ ते १८ पानांच्या वर असलेली फूट अनावश्यक समजून त्वरित काढून घ्यावी. त्यानंतर थायोफिनेट मिथाईल १ ग्रॅम प्रती लीटरप्रमाणे फवारणी करावी. यावेळी वातावरणात आर्द्रता भरपूर असल्यामुळे जैविक बुरशीनाशकांच्या वापरावर जोर द्यावा. यामध्ये ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबटिलिस, स्युडोमोनास इ. चा समावेश असेल. जैविक नियंत्रणामुळे वेलीचा रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल. रोगनियंत्रणाकरिता जैविक घटकांची संख्या या वातावरणात वेगाने वाढते. त्यामुळे यावेळी कमी संख्या असलेले जैविक घटकही चांगले कार्य करतील. याचा वापर फवारणी तसेच जमिनीतूनही करता येतो. जमिनीतून वापर करायचा झाल्यास उदा. ट्रायकोडर्मा २.५ ते ३ लीटर प्रती एकर या प्रमाणे ठिबकद्वारे देता येईल. ही साधारणतः ८ ते १० दिवसाच्या फरकाने चार ते पाच वेळी ठिबकद्वारे देता येईल. फवारणीद्वारे वापर करायचा झाल्यास ४ ते ५ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणे करावा. यावेळी कॅनोपी पूर्ण झालेली असल्यामुळे ४०० ते ४५० लीटर पाणी प्रती एकर वापरावे. नवीन बागेचे व्यवस्थापन फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतलेल्या रिकटनंतर खोड तयार होऊन ओलांड्याचा एक टप्पा तयार झाला. ज्या बागेत ओलांडे इंग्रजी एच आकाराप्रमाणे तयार झालेले असतील, अशा प्रत्येक ओलांड्यावर चार ते पाच काड्या तयार झाल्या असाव्यात. यालाच आपण फलधारित काड्या असेही म्हणतात. या वेळी ज्या ज्या बागेत कोरडे वातावरण आहे, अशा ठिकाणी ओलांड्याच्या दुसरा टप्पा सुरू करायला हरकत नाही. ओलांड्याच्या शेवटी असलेली काडी पुन्हा तारेवर बांधून सहा ते सात पानावर खुडून घ्यावी. यानंतर निघालेल्या बगलफुटीवर सूक्ष्मघड निर्मिती होण्याकरिता पुरेसा सूर्यप्रकाश नसेल, मात्र, संजीवके (६ बीए आणि युरासील) आणि स्फुरदयुक्त खते (०-४०-३७ हे खत २ ते २.५ ग्रॅम प्रती लीटर पाणी - चार ते पाच फवारण्या) करून घ्याव्यात. त्यानंतरच्या कालावधीत एसओपी २५ ते ३० किलो प्रती एकर या प्रमाणे द्यावे. असे केल्यास ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार होऊन यावेळी पुन्हा आठ ते दहा फलधारीत काड्या तयार करून घेता येतील. संपर्क- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)