सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र लॅाकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यात कृषिसेवा केंद्रांचाही समावेश होतो. परंतु, ‘कोरोना’च्या भीतीने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची सेवा विस्कळीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पट्ट्यातील बहुतेक सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याला प्राधान्य दिले आहे.
जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी असतो. अनेक भागात ज्वारी, गहू, हरभऱ्याची कापणी सध्या अंतिम टप्प्यात आहे, काही ठिकाणी ती पार पडली आहे. पिके ऐन बहारात असतानाच कोरोना आल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः द्राक्ष, कलिंगड, खरबूज यासारखी फळे, भाज्या आणि कांदा यासारखी पिके सध्या शेतात आहेत. या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने विविध नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यातून कसेबसे बाहेर येतो न येतो तोच कोरोनाने गाठले आहे.
काही शेतकरी धडपड करून ही फळे, भाज्या विक्रीसाठी नेत आहेत. पण, सर्वांनाच ते जमत नसल्याने अडचण झाली आहे. या दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना खते आणि औषधांची गरज आहे. पण, कृषी विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
जिल्ह्यात जवळपास २५०० हून अधिक कृषी सेवा केंद्रे आहेत. पण, त्यांपैकी अगदी बोटावर मोजण्याइतपत आणि तीही गावातील दुकाने सुरु आहेत. शहरातील एकही दुकान उघडे नाही. ‘कोरोना’च्या भीतीने विक्रेत्यांनी स्वतःहूनच ही दुकाने बंद ठेवल्याचे सांगण्यात येते. शासनाने कृषी सेवा केंद्रांना अत्यावश्यक सेवेत घातल्याने दुकाने उघडण्याचे आवाहन केले आहे. पण, दुकानदार स्वतःहूनच बंद ठेऊन काळजी घेत आहेत. किमान लॅाकडाऊन काळापर्यंत तरी दुकाने उघडली जाणार नाहीत, असे सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.