नाशिक : ‘‘कर्जमुक्ती योजनेद्वारे जिल्हा बँकेला ९१५ कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत ८८ कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे. आतापर्यंत १३५ कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे. तरीही जिल्हा बँकेला सर्वाधिक ९१५ कोटींचे रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्टे आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करावे’’, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्या.
शेतकऱ्यांना वेळेत कर्जवाटप व्हावे, यादृष्टीने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेन्दू शेखर, राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मांढरे म्हणाले, ‘‘सर्वाधिक उद्दीष्टे देण्यात आलेल्या मुख्य दहा बँकांमार्फत आतापर्यंत १ हजार ६१० कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले. मुख्य दहा बँकांची पीक कर्जवाटपाची टक्केवारी ६३ टक्के आहे. काही बँकांनी खूप चांगल्या पद्धतीने आणि तत्परतेने कर्जवाटप केले. बँक ऑफ महाराष्ट्र ६५ टक्के, नाशिक जिल्हा बँकेने सर्वसाधारण कर्जवाटप ३३६ कोटीपर्यंत केले आहे.
मांढरे म्हणाले, ‘‘२०१९ मध्ये पीक कर्जवाटपाचे ३ हजार १४७ कोटींचे उद्दिष्ट होते. शेतकऱ्यांना आजअखेर १ हजार ४६७ कोटी इतके वाटप करण्यात आले. परंतु, यावर्षी ३ हजार ३०३ कोटींचे उद्दिष्ट आहे. वाटप १ हजार ८०७ कोटींचे झाले आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा प्रत्यक्ष वाटप जवळपास ३४० कोटी रुपयांनी अधिक झाले आहे. त्यामुळे ही अतिशय समाधानाची बाब आहे.’’
‘कर्जमुक्ती’तून २४५ कोटीचे कर्जवाटप
मागच्या वर्षी ज्या लोकांचे कर्ज थकीत होते. त्यांचे कर्ज महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शासनाने फेडून त्यांना नवीन कर्जासाठी पात्र ठरविले. साधारणपणे १ हजार ७५ कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. नवीन कर्ज घेण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत २४५ कोटीपर्यंत कर्ज वाटप करण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.