अकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या विषबाधा रोखण्यासाठी प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री केली जाऊ नये, असे कृषी केंद्र विक्रेत्यांना सूचित करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेला केले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष प्रभाकरराव मानकर यांच्या माध्यमातून व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले.
आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये अकोला जिल्ह्यात शेतकरी, शेतमजुरांकडून पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी केली जाते. विषबाधेच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे गेल्या वर्षी निदर्शनास आले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. त्या अनुषंगाने विषबाधेच्या घटना कमी करण्यासाठी शासनाने पाच कीटकनाशकावर ६० दिवसासाठी अमरावती विभागात बंदी घातली होती.
कृषी विभागाने व जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते, वितरक व उत्पादक कंपनी यांनी कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती केली. त्याचा परिणाम चांगला मिळाला. जिल्ह्यात विषबाधा व विषबाधेमुळे घडणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. जिल्ह्यात २०२० मध्ये कापूस, सोयाबीन इतर पिकांची पेरणी झालेली असून पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली दिसून येत आहे.
सध्या शेतकरी पीक संरक्षणासाठी अतिविषारी कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याने जिल्ह्यात विषबाधेची प्रकरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने विक्री, वितरण व वापरास मनाई केलेल्या पाच कीटकनाशकांची विक्री होऊ नये. यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते व वितरकांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.