प्रत्येक कामांच्या नियोजनापूर्वी दैनंदिन हवामान अंदाज पाहण्याची सवय करून घ्यावी. त्यायोगे पाणी देणे, खुरपणी करणे, खते देणे, फवारणी करणे, काढणी व साठवण करणे, विक्रीसाठी पाठविणे अशा कामांमध्ये अचानक उद्भवणाऱ्या पाऊस व अन्य आपत्तीमुळे अडचणी येणार नाहीत. केवळ एका हंगामापुरता तात्पुरता विचार न करता पुढील रब्बी आणि उन्हाळी हंगामांचाही विचार करून पीक व पुरक व्यवसायांचे नियोजन करावे. आपल्या देशात यंदा सरासरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मात्र, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भूपृष्ठावरील आणि भूपृष्ठाखालील पाणी साठ्याचा वापर बेफिकिरीने करून चालणार नाही. या मॉन्सुन अंदाजामुळे शेतकऱ्यांसह शहरवासियांनी हुरळून जाण्याची गरज नाही. त्याऐवजी सन २०१२ व २०१६ च्या दुष्काळाची आठवण ठेवावी. कारण, यावर्षीचा मॉन्सून अंदाज नीट अभ्यासल्यास तो सरासरीच्या तुलनेत ९६ ते १०० टक्के पडण्याची शक्यता ६२ टक्के आहे. म्हणजेच अर्ध्यापेक्षा थोडी अधिक शक्यता आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे जवळपास अर्धी शक्यता सरासरीपेक्षा थोडी कमी आणि खुपच कमी पाऊस पडण्याची आहे. त्याच प्रमाणे जिल्हा व तालुकानिहाय वितरणाबाबत काही अचूकतेने पावसाचा अंदाज सांगण्याइतकी क्षमता आपल्याकडे नाही. कारण भारत हा विषुववृत्ताजवळ असून, येथे वातावरणीय बदल अगदी अल्पकाळात होतात. यामुळे येथील हवामानाचे दीर्घकालीन किंवा मध्यम कालीन हवामान अंदाज देणे अवघड असते. भारतातील सर्वच जिल्ह्यांत सरासरीइतका पाऊस पडेलच असे नाही. कारण या आधीही असे घडलेले नाही. मागील वर्षाची महाराष्ट्राची स्थिती पाहता विशेषतः मराठवाडा व विदर्भात पावसाचे असमान वितरण हे नैसर्गिक आहे. जगभरातील बहुतांश सर्व प्रकारचे कृषीहवामान विभाग आपल्या देशात आढळतात. हीच आपल्या देशाची हवामानदृष्ट्या ताकद आहे. महाराष्ट्रात फक्त बर्फ वगळता, थंड, समशितोष्ण, उष्ण अशा प्रकारचे हवामान विभाग आपल्याकडे आहेत. यामुळे विविध हंगामात विविध प्रकारचे अन्नधान्य, फळे, भाजीपाला, चारा, वनौषधी पिकांची हंगामानुसार, विभागनिहाय लागवड करता येते. सध्या काही प्रमाणात वातावरणात बदल घडून आले आहेत. यामुळे थोडासा काही विभागात पिकांचा हंगाम बदलला आहे, असे दिसते. आधीच कोरोनामुळे शेतीचे कंबरडे पुरते मोडले आहे. विशेषतः भाजीपाला, वेलवर्गीय फळपिके आणि इतर फळे पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अगदीच विदारक झाली आहे. या संकटामुळे आणि आर्थिक अडचण अशा अनिश्चिततेच्या सावटाखालीच यंदाचा खरीप हंगाम जाण्याची शक्यता आहे. विभागनिहाय पीक उत्पादनातील समस्या वेगवेगळ्या असल्या तरी पाण्याची उणीव ही सर्वत्र समान समस्या आहे. आपला ८० टक्के भाग कोरडवाहू क्षेत्रामध्ये मोडतो. यामुळे पाण्याची उपलब्धी व वापर हे यावरील समस्येचे उत्तर ठरते. सध्याच्या अंदाजाप्रमाणे पाण्याची उपलब्धता यावर्षी चांगली होण्याची शक्यता आहे. मात्र, केवळ खरिपाचा विचार करून न थांबता पुढील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी विचार केला पाहिजे. त्यातून शेती आणि शेतीपुरक जोड व्यवसायाची आखणी केली पाहिजे. अर्थातच याकरिता पाण्याची उपलब्धी, त्याचा वापर, पाणी वापर कार्यक्षमता (वॉटर यूज इफिशियन्सी), सिंचन वापर कार्यक्षमता (ईरिगेशन यूज इफिशियन्सी) याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. यावरच आधारीत पिकांस सिंचन देणे अत्यावश्यक आहे. भविष्यात पाण्याच्या कमतरतेमुळे येणारा रब्बी व उन्हाळी हंगाम संकटात येऊ नये, यासाठी या पावसाळ्यापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी पुढील बाबी उपयुक्त ठरतील.
उत्पादनवाढीसाठी सूक्ष्म वातावरणशास्त्र उपयुक्त
भाजीपाला लागवड भारतातील मध्य आणि दक्षिण भागामध्ये भाजीपाल्याची लागवड केली जाते. उत्तर आणि उत्तर पूर्व भारताप्रमाणेच महाराष्ट्रातील कोकण आणि सह्याद्रीच्या उपपर्वतीय रांगामध्ये भाजीपाला लागवडीचे प्रमाण कमी आहे. या भागासह नाशिक, नवेगावपर्यंत भाजीपाला लागवडीला मोठा वाव आहे. योग्य तंत्राच्या साह्याने कमी पाण्यामध्ये अधिक क्षेत्र भाजीपाला लागवडीखाली आणावे लागणार आहे.
संपर्क - डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ (कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.