सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान मोदी

देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा विषाणू देशातून गेलेला नाही. त्यामुळे लस येत नाही तोपर्यंत देशवासीयांनी कोरोनासंदर्भात आरोग्यविषयक दिशानिर्देशांचे पालन करताना हयगय करू नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.
Don't be careless during festivals
Don't be careless during festivals

नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा विषाणू देशातून गेलेला नाही. त्यामुळे लस येत नाही तोपर्यंत देशवासीयांनी कोरोनासंदर्भात आरोग्यविषयक दिशानिर्देशांचे पालन करताना हयगय करू नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. नवरात्रासह आगामी दसरा, ईद, दिवाळी, छटपूजा, गुरू नानक जयंती हा सणासुदीचा काळ भारतीयांच्या जीवनातही आनंद घेऊन यावा अशी मी प्रार्थना करतो. आरोग्यविषयक खबरदारी घेताना हयगय करू नका तसेच आपला व इतरांचा सणांचा आनंद हिरावून घेऊ नका, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधानांनी आज सायंकाळी देशाला संबोधित करताना सांगितले, की कोरोनाविरूध्द लढाईत जनता कर्फ्यूपासून आजतागायत भारतवासीयांनी मोठा प्रवास केला आहे. आर्थिक व इतर व्यवहारांत गती येत आहे. लोक जबाबदाऱ्या सांभाळून जीवनाला गती देण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सणासुदीच्या काळात बाजारपेठांतही हळूहळू व्यवहार वाढत आहेत. मागील ७-८ महिन्यांत भारताने परिस्थिती जशी सांभाळली त्यात आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे. भारतातील कोरोना व्यवस्थापन परिस्थिती विकसित देशांपेक्षा चांगली असल्याचे सांगताना मोदी म्हणाले, की अमेरिका, स्पेन, ब्राझील, ब्रिटन यासारख्या संपन्न देशांच्या तुलनेत भारताने जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचविण्यात यश मिळविले आहे. आमच्याकडे रिकव्हरी रेट जास्त आहे व मृत्यूदर कमी आहे. मात्र अजून ही निष्काळजीपणे वागण्याची ही वेळ नाही, असा त्यांनी इशारा दिला.

मोदी म्हणाले...

  •  कोरोना रुग्णांसाठी देशात सध्या ९० लाखांपेक्षा जास्त खाटा, १२ हजार विलगीकरण कक्ष, २००० पेक्षा जास्त चाचण्या प्रयोगशाळा आहेत. चाचण्यांची संख्या लवकरच १० कोटींहून जास्त होईल. चाचण्यांची गतिमानता ही भारताची सशक्त बाजू ठरली आहे.
  •  कोरोना लस आली की लवकरात लवकर प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारची तयारी वेगाने सुरू आहे.
  •  सेवा परमो धर्माः च्या मंत्रानुसार आमचे डॉक्‍टर, नर्स, आरोग्य कर्मचारी इतक्‍या मोठ्या लोकसंख्येची गेले अनेक महिने निःस्वार्थीपणे सेवा करत आहेत.
  •  आता अनेक लोकांनी सावधगिरी बाळगणे बंद केले किंवा त्यात ते ढिलाई करत आहेत हे चांगले नाही. बिना मास्क तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्ही आपल्यासह कुटुंबीयांना संकटात टाकत आहात.
  •  सणासुदीच्या काळातही आम्ही मास्क, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतरभान या कोरोना त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष करता कामा नये. थोडासा निष्काळजीपणा सणाचा आनंद हिरावून घेऊ शकते.
  •  अमेरिकेसह अनेक विकसित देशांत पुन्हा रूग्ण वाढत आहेत. भारतात परिस्थिती तुलनेने आशादायक असली तरी ‘‘पकी खेती देखके गर्व किया किसान, अजहूँ जोला बहुत है, घर आवे तब जान।।’’ या दोह्यामध्ये संत कबीराने सांगितलेला अति आत्मविश्‍वास कोरोनाबाबतही लक्षात ठेवला पाहिजे.
  • मानवजातीला वाचविण्यासाठी सारे देश काम करत आहेत. भारतासह काही देशांच्या लशींच्या चाचण्या अग्रेसर व आशादायक स्थितीत आहेत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com