दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी व्यवस्थापनावर भरः डाॅ. अनिल बोंडे

डाॅ. अनिल बोंडे
डाॅ. अनिल बोंडे

पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार आहे. दरवर्षी कमी पाऊस होत असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. दुष्काळावर दरवर्षी सरकारचे चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च होतात. यावर मार्ग काढण्यासाठी दरवर्षी कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार आहे. यंदा कृत्रिम पावसासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील काळात अर्थसंकल्पात शंभर कोटींची तरतूद केली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.  कृषिमंत्री म्हणाले, की राज्यातील ठाणे, कोल्हापूर विभागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भाग, मराठवाडा व विदर्भात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यापुढील काळात कृत्रिम पावसासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आहे की नाही, याची माहिती हवामान विभागाने शासनाला देणे गरजेचे आहे. दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस प्रयोगासाठी शासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी महाबळेश्‍वर, सोलापूर, नागपूर या तीन ठिकाणी रडारची व्यवस्था करण्यात आली आहे. येथून परिसरातील दोनशे किलोमीटर अंतरावर रडारच्या माध्यमातून सोडिअम क्लोराईची फवारणी करून ३० जुलैपूर्वी पाऊस पाडण्यात येईल. पूर्वी अन्नधान्याचा दुष्काळ होता. आता पाण्याचा दुष्काळ आहे. पाणी हे सर्वस्व आहे. त्यामुळे पुढील काळात पाण्याच्या व्यवस्थापनावर भर देऊन पाणी वाचवावे लागणार आहे. परंतु दरवर्षी कमी पाऊस होत असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. या दुष्काळावर दरवर्षी सरकारचे चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च होतात. यावर मार्ग काढण्यासाठी दरवर्षी कृत्रिम पाऊस पाडल्यास पाण्याची उपलब्धता होईल. कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पावसाच्या स्थितीवर आढावा बैठक पुण्यातील हवामान विभागात शुक्रवारी (ता. १९) पार पडली. या वेळी कृषिमंत्र्यांनी ही माहिती दिली. या वेळी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस. पै, कृषी आयुक्त सुहास दिवसे, हवामान विभागातील वैज्ञानिक डॉ. ए. के. श्रीवास्तव, डॉ. ओ. पी. श्रीजीत, यू. आर. जोशी, डॉ. कृपान घोष, डॉ. अनुपम कश्यपी, बाल सुब्रमण्यम, डॉ. ठाकूरदा, के. एन. मोहन, पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे आदी उपस्थित होते.  पाच आॅगस्टला  कार्यशाळा घेणार  दुबई, चीन येथेही कमी पाऊस पडतो. येथे दरवर्षी कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जातात. त्याच धर्तीवर राज्यातही कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्यातील चार संस्थांचे शास्त्रज्ञ आणि दुबई, चीन येथील शास्त्रज्ञ यांची एकत्रित कार्यशाळा पाच आॅगस्टला पुण्यात घेतली जाईल.  कृषिमंत्री म्हणाले...

  •   सततच्या दुष्काळामुळे पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार 
  •   दुष्काळावर दरवर्षी सरकारचे चार ते पाच हजार कोटी रुपये खर्च
  •   यंदा कृत्रिम पावसासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद
  •   पुढील काळात अर्थसंकल्पात शंभर कोटींची तरतूद करणार
  •   मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, मराठवाडा व विदर्भात अत्यंत कमी पाऊस
  •   कृत्रिम पावसासाठी पोषक वातावरणाची माहिती हवामान विभागाने द्यावी
  •   महाबळेश्‍वर, सोलापूर, नागपूर या तीन ठिकाणी रडारची व्यवस्था 
  •   ३० जुलैपूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येईल
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com