शेतकऱ्यांना १३ योजनांचा लाभ ‘महाडीबीटी’द्वारे एकाच क्लिकवरः डाॅ. अनिल बोंडे

शेतकऱ्यांना १३ योजनांचा लाभ ‘महाडीबीटी’द्वारे एकाच क्लिकवरः डाॅ. अनिल बोंडे
शेतकऱ्यांना १३ योजनांचा लाभ ‘महाडीबीटी’द्वारे एकाच क्लिकवरः डाॅ. अनिल बोंडे

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी २,१०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जागतिक बँकेशी करार करून ७० टक्के निधी अल्प व्याज दरात प्राप्त होणार आहे. कृषिसंदर्भातील १३ योजनांचा लाभ एका क्लिकवर शेतकऱ्यांना मिळावा आणि थेट अनुदान वितरणात पारदर्शकता यावी यासाठी ‘महाडीबीटी’ या प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयातील मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघामध्ये कृषी विभागाच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांना संबोधताना कृषिमंत्री अनिल बोंडे बोलत होते. या पत्रकार परिषदेस विभागाचे सचिव एकनाथ डवले, तंत्रज्ञानचे प्रधान सचिव श्री. श्रीनिवास, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक श्री. रस्तोगी उपस्थित होते. डॉ. बोंडे म्हणाले, ‘महाडीबीटी’ प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना एका क्लिकवर प्रधानमंत्री कृषी योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन अशा १३ योजनांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी एकच अर्ज करावा लागणार आहे. योजनेचा लाभ घेताना ६० टक्के अनुदान शासन देणार आहे. यामुळे पारदर्शकरीत्या शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. कल्पांतर्गत २१०० कोटी गुंतवणूक प्रस्तावित असून, ७० टक्के निधी जागतिक बँकेकडून, अल्प व्याज दरात कर्ज तर, आंतरराष्ट्रीय सल्लागारांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तर २६.६७ टक्के निधी राज्य शासन देणार असून, ३.३३ टक्के निधी खासगी क्षेत्राचा सहभाग म्हणून ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याची माहितीही श्री. बोंडे यांनी यावेळी दिली. ‘महाडीबीटी’ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांची माहिती डेटाबेस करणे, योजनेचा लाभ मिळेपर्यंत अर्जाची स्थिती पाहणे, बनावट शेतकऱ्यांना लाभ टाळण्यात येणार असून, नवीन आणि पात्र शेतकऱ्यांना याद्वारेलाभ मिळणार आहे. यामुळे लाभार्थींना अनुदान वाटपाची संपूर्णत: स्वयंचलित ऑनलाइन प्रक्रिया असल्यामुळे विभागाच्या कामाची गती वाढण्यास मदत होणार आहे. आधार कार्ड आणि सातबारा यासोबत लिंक करण्यात येणार असून, योजना अंमलबजावणीत मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असल्याची माहितीही श्री. बोंडे यांनी यावेळी दिली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी  प्रकल्पाचे संचालक श्री. रस्तोगी यांनी म्हणाले की, १५ जिल्ह्यात १४२ गावांतील अडीच लाख शेतकऱ्यांना हवामान बदलाला सामोरे कसे जायचे यासंदर्भात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री. रस्तोगी यांनी दिली. ‘मूल्यसाखळी प्रकल्प’ उभारण्यासाठी अर्थसाह्य या प्रकल्पाद्वारे राज्यातील कृषिपूरक उत्पादनांसाठी तसेच, विविध पिकांसाठी काढणी पश्चात हाताळणी व्यवस्थापन, शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारणी व बाजार जोडणी व्यवस्था निर्माण करून राज्यात कार्यक्षम व सर्वसमावेशी ‘एकात्मिक मूल्य साखळी’ उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी राज्यातील ५० महत्त्वाच्या पिकांची यादी तयार करण्यात आली असून, या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, गट, महिला बचत गट, स्वयं साह्यता गट, फेडरेशन्स, संघ, सहकारी संस्था, सोसायट्या आदींच्या माध्यमातून संघटित झालेल्या शेतकऱ्यांच्या संस्थांना ‘मूल्यसाखळी प्रकल्प’ उभारण्यासाठी अर्थसाह्य देण्यात येणार असून, या प्रकल्पांतर्गत २१०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ७० टक्के निधी जागतिक बँकेकडून अल्प व्याज दारात कर्ज स्वरूपात तर २६.६७ टक्के निधी राज्य शासनाच्या स्वनिधीतून तर ३.३३ टक्के निधी खासगी क्षेत्राच्या सहभागातून ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमात उपलब्ध होणार आहे. ३०० प्रकल्पांद्वारे योजना राबविणार स्मार्ट योजनेसंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. बोंडे म्हणाले, ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये ३०० प्रकल्पांद्वारे राबविण्यात येणार आहे. या स्मार्ट योजनेमुळे कृषिपूरक उत्पादनांची विक्री आणि पणन व्यवस्थापन, शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणी व बाजार जोडणी व्यवस्था निर्माण करणे, राज्यात कार्यक्षम व सर्वसमावेशी एकात्मिक मूल्य साखळी उभारणीचे काम करण्यात येणार आहे. तसेच, महिला बचत गट, शेतकरी गट, सहकारी संस्था, शेती उत्पादक कंपन्या अशा संघटित संस्थांना मूल्य साखळी प्रकल्प उभारण्यासाठी अर्थसहाय देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक क्विंटलमागे एक हजार रुपयांपेक्षा जास्त नफा होणार आहे. यामुळे साठवणूक करून योग्य भाव आल्यास विकणे तसेच प्रक्रिया करून माल विकण्यासंदर्भातील माहिती शेतकऱ्यांना मिळणार असून, कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होणार आहे. शेतकऱ्यांना यापुढे एपीएमसी मार्केटवर अवलंबून रहावे लागणार नाही, अशी माहितीही डॉ. बोंडे यांनी यावेळी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com