अन्न सुरक्षेत कृषी अर्थशास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची : डॅा.अशोक दलवाई

agriculture economists
agriculture economists

परभणी : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी बाजार व्यवस्था कार्यक्षम करण्यासोबतच शेतमालाच्या नासाडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी काढणी पश्चात व्यवस्थापन यंत्रणेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. अन्न सुरक्षा उत्पन्नाच्या सुरक्षितेत परावर्तित करून येत्या काळात शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये कृषी अर्थशास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठी अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्‍त्र विभाग आणि महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍यातर्फे शनिवार (ता. २१) ते रविवार (ता. २२) या कालावधीत परभणी येथे आयोजित २२ व्या राष्‍ट्रीय परिषदेचेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २१) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहामध्ये झाले. या वेळी शेतकऱ्यांसाठी शेती या विषयावर डॉ. दलवाई यांचे बीजभाषण झाले. कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होते. राज्‍य कृषिमूल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष पाशा पटेल, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ. दिगंबर पेरके, महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे, महाबीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. एस. डी. वानखेडे आदी उपस्थित होते. 

डॉ. दलवाई पुढे म्हणाले, की शेतीसाठी माती आणि पाणी हे महत्त्वपूर्ण घटक आहेत. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी या नैसर्गिक संसाधनाचा कार्यक्षम उपयोग करावा लागेल. पैदासकाराच्या प्रयत्नांमुळे अन्नधान्यात स्वंयपूर्णता आली. परंतु, काढणी पश्चात शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान कमी करण्यासाठी साठवणूक व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच जवळची बाजार पेठेत शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी निविष्ठावरील खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती पध्दतीला प्रोत्साहन दिले जात आहे. उत्पादन केंद्रित शेतीवरून उत्पन्न केंद्रित शेती यावर भर दिला जात आहे. 

पाशा पटेल म्हणाले, की हवामान बदलामुळे शेती व्यवसायापुढे मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. डॉ. ढवण म्हणाले, की अन्न सुरक्षा आणि जमिनीची सुरक्षा यांची सांगड घालूनच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठाने सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी शेती पध्दतीचे मॅाडेल विकसित केले आहेत. डॉ. देशमुख, डॅा. गोखले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. महिंद्रे यांनी संस्थेचा कार्यअहवाल सादर केला. सूत्रसंचालन डॉ. आर. व्ही. चव्हाण केले तर आभार पेरके यांनी मानले. 

या दोन दिवसीय परिषदेमध्ये देशातील तसेच राज्‍यातील शंभरपेक्षा जास्‍त कृषी शास्‍त्रज्ञ सहभागी झाले आहेत. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करणे, कृषी विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषी विपणन धोरण, शेतमाल मूल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे सादरीकरण करणार आहेत. रविवारी (ता. २२) या परिषदेचा समारोप हैदराबाद येथील राष्‍ट्रीय कृषी विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक डॉ. के. सी. गुम्‍मागोलमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेत. या वेळी डॉ. गुम्‍मागोलमठ यांचे भारतीय शेतमाल बाजारपेठ सुधारणा यावर व्‍याख्‍यान होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com