केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही : डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू

केवळ आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही : डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू
केवळ आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही : डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू

परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार अन्नद्रव्यांच्या मात्रा दिलेल्या विविध पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन तालुकानिहाय क्लस्टर तयार करून करावे लागेल. एप्रिल-मे महिन्यातच शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्यपत्रिका मिळाल्या, तर खरीप हंगामातील योग्य खत नियोजन करणे शक्य होईल. कृषी विद्यापीठांनी सुचविलेल्या विविध पिकांसाठी अन्नद्रव्यांच्या मात्रांच्या शिफारशी जुन्या झाल्या आहेत. त्यांचे पुनर्विलोकन करून सुधारित शिफारशी सुचविणे आवश्यक आहे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले आहे.

पशुधनाची संख्या कमी होत असल्यामुळे शेणखताची पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत नाही. पिकांचे अवशेष जाळून टाकले जात आहेत. त्यामुळे राज्यातील जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत असल्याने सुपीकता कमी होत आहे. जास्त पावसाच्या प्रदेशात जमिनीची धूप होऊन मातीचा सुपीक थर वाहून जात आहे. अनेक जिल्ह्यांत जस्त, लोह, बोराॅन, गंधक या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येत आहे.  

नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा वापर योग्य प्रमाणात होत नाही. नत्राचा जास्त, तर पोटॅशचा कमी वापर होत आहे. अन्नद्रव्यांच्या मात्रांच्या प्रमाणात उत्पादन मिळत नाही. पश्चिम महाराष्ट्रात खतांचा जास्त वापर आहे, तर पूर्व विदर्भात तो अत्यंत कमी आहे. काही प्रगतिशील शेतकऱ्यांचा अपवाद वगळता इतरांमध्ये सेंद्रिय कर्बाबाबत जागरूकता नाही.

कृषी विद्यापीठांनी विविध पिकांसाठी केलेल्या अन्नद्रव्यांच्या मात्रांच्या शिफारशी १० ते २० वर्षे जुन्या झाल्या आहेत. त्यांचे पुनर्विलोकन करण्याची गरज आहे. फास्ट कंपोस्टिंग करण्यासाठी जिवाणू कल्चर तयार करावी लागतील. शून्य मशागत (झिरो टिलेज) पद्धतीचा अवलंब करावा लागेल. शून्य मशागत पद्धतीने भात, सोयाबीन नंतर हरभऱ्याची पेरणी केली जात आहे. कृषी विद्यापीठांनी जैविक खंताचे नवीन प्रकार, झिरो टिलेज पद्धतीवर संशोधन करणे आवश्यक आहे.

कृषी वानिकीवर (अॅग्रो फाॅरेस्ट्री) भर द्यावा लागेल. अतिपावसामुळे जमिनीची धूप होणाऱ्या प्रदेशात सेंद्रिय कर्ब वाढविणे शक्य नाही. परंतु मैदानी प्रदेशात ते वाढविता येईल. त्यासाठी पिकांचे अवशेष जमिनीत गाडून टाकणे, मल्चिंगवर शेतकऱ्यांना भर द्यावा लागेल. वनाच्छादन वाढविणे देखील आवश्यक आहे. जमिनीतील कर्बाचे संवर्धन करण्यासाठी अमेरिकेप्रमाणे आपल्या देशातदेखील कार्बन क्रेडिट संकल्पना राबविणे आवश्यक आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले पाहिजे.

मृदा आरोग्य पत्रिका अभियान योजनेला माती परीक्षण आणि खतांचा संतुलित वापर असे नाव देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मृदा नमुन्यांचे परीक्षण मार्च अखेर पूर्ण करून एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या हातात जमीन आरोग्य पत्रिका पोचवल्या, तर खरीप हंगामात खतांचे नियोजन करता येईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ जमिनीच्या आरोग्य पत्रिका वाटप करून फारसा उपयोग होणार नाही.

माती परीक्षणानंतरच्या शिफारशीनुसार अन्नद्रव्यांच्या मात्रा दिलेल्या विविध पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन प्रत्येक तालुक्यात क्लस्टर तयार करून करण्यात यावे. या प्रात्यक्षिकांच्या ठिकाणी प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संतुलित खत वापराचे महत्त्व समजावून सांगायला हवे, तरच संतुलित खतांच्या वापरास मदत होईल. शेतकऱ्यांचा खताचा वापर अाणि अनावश्यक खर्च कमी होईल.

- डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू,  कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com