‘ई-नाम’मध्ये शेतकरी कंपन्यांच्या समावेशाची गरज: डॉ. के. सी. गुम्‍मागोलमठ

dr. gummagomath
dr. gummagomath

परभणी ः राष्ट्रीय कृषी बाजार (ई- नाम) मुळे कृषी विपणन प्रक्रियेत स्पर्धा निर्माण झाली. परिणामी, दर्जेदार शेतमालाला योग्य दर मिळून शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. त्यामुळे ई-नाम प्रणालीची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी शेतकरी, व्यापारी, बाजार समित्यांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील ई-नाममध्ये समाविष्ट करून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन हैदराबाद येथील राष्‍ट्रीय कृषी विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक (देखरेख आणि मूल्यांकन) डॉ. के. सी. गुम्‍मागोलमठ यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्‍त्र विभाग आणि महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍यातर्फे शनिवार (ता. २१) ते रविवार (ता. २२) या कालावधीत परभणी येथे आयोजित २२ व्या राष्‍ट्रीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमात रविवारी (ता. २२) भारतीय शेतमाल बाजारपेठ सुधारणा विषयावर डॅा. गुम्‍मागोलमठ बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी डॅा. डी. बी. यादव होते. कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ. दिगंबर पेरके, महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे, डॅा. बी. व्ही. आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॅा. गुम्मागोलमठ पुढे म्हणाले, की कृषी विपणन व्यवस्थेत शेतकऱ्यांपेक्षा मध्यस्थांचा अधिक फायदा होत आहे. शेतमालाच्या बाजार व्यवस्थेतील मध्यथांच्या साखळीमुळे शेतकरी तसेच ग्राहकांचे देखील नुकसान होत आहे. ग्राहक केंद्रित बाजारपेठेत शेतमालाच्या किंमती वाढतात त्या वेळी मध्यस्थांचा फायदा होतो. शेतकऱ्यांचे नुकसान टाळून उत्पन्न वाढविण्यासाठी सक्षम बाजारव्यवस्थेची गरज आहे. गावागावातून भरणारे आठवडे बाजार हा कृषी विपणन व्यवस्थेतील प्राथमिक घटक आहे. त्यामुळे आठवडे बाजार भरणारी सर्व ठिकाणे पक्क्या रस्त्यांनी जोडणे आवश्यक आहे. पाणी, वीज, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कृषी विपणन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जुन्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात सुधारणा केल्या जात आहेत. बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र सिमित असते. बाजार समित्यांमध्ये अनेक गैरप्रकार चालतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दर्जेदार शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय कृषी बाजार प्रणाली (ई नाम) अंतर्गत ऑनलाइन व्यवहाराचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  ‘‘आजवर ‘ई-नाम’ अंतर्गंत देशातील ५८५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या कृषी विपणन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील ‘ई-नाम’मध्ये समाविष्ट करणे आवश्यक झाले आहे. अनेक राज्यात कंत्राटी शेती यशस्वी होत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. परंतु, शेतकऱ्यांचे कॅार्पोरेट कंपन्यांकडून होत असलेले शोषण थांबविण्यासाठी कंत्राटी शेती कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्याचा मसुदा तयार आहे. कंत्राटी शेती पध्दती यशस्वी होण्यासाठी शेतकरी आणि कंपनी या दोघांमध्ये विश्वास सर्वाधिक महत्त्वाचा आहे,’’ असेही ते म्हणाले. डॅा. आर. व्ही. चव्हाण सूत्रसंचालन केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com