वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडी

वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडी
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडी

अकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे वेदनादायी बनले अाहे. अाटत चाललेल्या विहिरी, बाजारभावाचे गंभीर प्रश्न उभे राहिले. पाण्याच्या दुर्भीक्षामुळे अकोट तालुक्यातील बोर्डी येथील संजय ताडे यांनी अडीच एकरांतील नऊ वर्षे वयाची संत्रा बाग तोडून टाकली अाहे. दुसरीकडे सिंदखेडराजा तालुक्यात गोरेगाव येथील अविनाश पंचाळ या युवा शेतकऱ्याने दुष्काळाशी दोन हात केले खरे, मात्र बाजारभाव नसल्याने केलेला खर्चसुद्धा बागेतून निघत नसल्याने डाळिंब बाग तोडणे सुरू केले आहे. असे चित्र आता ठिकठिकाणी दिसू लागले आहे. 

संजय रामनाथ ताडे यांची अकोट तालुक्यातील बोर्डी शिवारात अडीच एकरात संत्र्याची बाग होती. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी बाग उभी केली. मध्यंतरी या बागेने चांगले उत्पादनही दिले. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांत या भागात पाऊस कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली. अाधी विहीर अाटली. त्यानंतर २०० फुटांपेक्षा खोल असलेले बोअरवेलही कोरडे पडले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून बागेला द्यायलाही त्यांच्याकडे पाणी नव्हते. अखेरीस त्यांनी जड अंतकरणाने ही बाग तोडण्याचा निर्णय घेतला. 

गेल्या अाठवड्यात हे झाड तोडण्याचे काम पूर्ण झाले. अाज या शेतात संत्र्यांच्या झाडांचे अवशेष तेवढे पडून अाहेत. तीन महिन्यांपूर्वी हे शेत हिरवेगार होते. परंतु, जसे पाणी अाटले तशी बाग करपत होती. पाण्याची सोय न करता अाल्याने अखेरीस हे कठोर पाऊल उचलले. या भागात येत्या दोन महिन्यांत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअर तळ गाठणार अशी परिस्थिती अाहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला खरा मात्र एकही उपाययोजना लागू झालेली नाही. शासनाने या परिस्थितीत शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची मागणी संजय ताडे यांनी केली.        अविनाशने तोडली डाळिंब बाग सततचा दुष्काळ व अनंत अडचणींना तोंड देत गोरेगाव (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील अविनाश देविदास पंचाळ या शेतकऱ्यांने डाळिंब बाग जगविली. मात्र, सतत भाव पडल्यामुळे उत्पादन खर्चही निघेनासा झाला. यामुळे एक हेक्टर क्षेत्रातील डाळिंब बागेवर कुऱ्हाड चालविली अाहे. अविनाश हा एमए बीपीएड झालेला असून त्याने नोकरीच्या मागे न लागता २००९ मध्ये अडीच एकरात डाळिंबाची लागवड केली होती. त्यासाठी ठिबक बसविले. ठिबक संच, फिल्टर संच, पाइपलाइन, नळ्यासाठी सुमारे दीड लाखांवर खर्च केला. विहिरीचे खोलीकरणही केले. नंतर हिमायतबाग औरंगाबाद येथील शासकीय रोपवाटिकेतील भगवा जातीची डाळिंब रोपांची लागवड केली. झाडे वाढविली, फुलविली. दरम्यान पावसाळा कमी झाल्यामुळे पाणी कमी पडू लागले. यावर उपाय म्हणून बोअरवेल घेतले. त्यासाठी ८० हजार रुपये खर्च केला. 

पर्जन्यमान सतत कमी होत असल्याचे पाहून शेततळे घेऊन त्यात पाणी साठवून ठेवले. बाग मशागतीसाठी २५ एचपीचे चार लाखांचे ट्रॅक्टर घेतले. बाग फवारणीसाठी ८० हजारांचे फवारणी यंत्र अाणले. पाणी कमी पडल्यास बाहेरुन पाणी पुरविण्यासाठी एक लाखाचे टँकरही विकत घेतले. टँकरनेही पाणी आणून बाग जगविली. झाडांना फळेही चांगली लागली. फळांचा रंग व गुणवत्ता टिकविण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने विविध औषधी व बुरशीनाशकांच्या वेळोवेळी नियमितपणे वेळापत्रकानुसार फवारण्या करून सुरवातीला काही वर्षे बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. मात्र, मागील काही हंगामात भाव गडगडल्याने हाती उत्पादन खर्चही आला नाही. त्यामुळे बाग तोडण्याचा कठोर निर्णय घेतल्याचे अविनाश सांगतो.  तीन वर्षांपासून दुष्काळ वऱ्हाडात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती अाहे. फळबागांना दुष्काळाचा मोठा फटका बसतो आहे. जमिनीतील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. बोअरवेलला पाणी लागत नाही. बागा जगविण्यासाठी केलेला खर्च ही निघणे अशक्य झाल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com