नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही दुष्काळाचे संकट कायम

जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात यंदा अजूनही पाऊस नाही. आता महिना उलटला तरी पाऊस नसल्याने खरिपाची पिके अडचणीत येत आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या हंगामावर होणार आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळातून अजून शेतकरी सावरले नाहीत. मात्र, अजूनही पाऊस नसल्याने संकट कायम आहे. - संदीप भागवत, शेतकरी, एरंडगाव, ता. शेवगाव, जि. नगर.
दमदार पाऊस होईल या आशेने पेरण्या केल्या जात आहेत
दमदार पाऊस होईल या आशेने पेरण्या केल्या जात आहेत

नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर जिल्ह्यात यंदा पावसाळ्याचा सव्वा महिना उलटून गेला, तरी अजूनही दुष्काळाचे संकट कायम आहे. अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळला, तर अजूनही जिल्ह्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस नाही. त्याचा गंभीर परिणाम यंदाही खरीप पेरणीवर झाला आहे. आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ३५.६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या वर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरीप आणि रब्बी हंगामाला मोठा फटका बसला होता. तीच परिस्थिती यंदाही होते की काय, अशी शंका आता निर्माण होऊ लागली आहे. जिल्ह्यामध्ये खरिपाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७८ हजार ६३८ हेक्टर आहे. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ १ लाख ७० हजार ५११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

यंदा आतापर्यंत पेरणीची टक्केवारी ३५.६२ आहे. गेल्या काही दिवसांत ज्या भागांत पेरणी झाली, तेथेही पाऊस गायब झाला असून, सध्या फक्त सोसाट्याचा वारा वाहतो आहे. त्यामुळे उगवलेले कोंब सुकू लागले आहेत. अजून काही दिवस पाऊस आला नाही, तर दुबार पेरणीचे संकट उद्भवणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.  

चार तालुक्यांत पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस  जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या तुलनेत अजूनही श्रीरामपूर, नगर, शेवगाव, कर्जत या चार तालुक्यांत पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यात खरीप पेरण्यांचे प्रमाण अल्प आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील ९० टक्के, तर संगमनेरमध्ये ५४ टक्के पावसाची सरासरी वगळता अन्य तालुक्यांत पावसाची टक्केवारी चाळीस टक्क्‍यांच्या आतच आहे.

जिल्ह्याचा विचार करता आतापर्यंत ३३ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत ३८ टक्के पाऊस झाला होता. सरासरीच्या तुलनेत यंदा प्रशासनाकडे काही भागात चांगला पाऊस झाला असल्याची नोंद असली, तरी एकाच वेळी तो न झाल्याने ओलावा झाला नाही. त्यामुळे पेरण्या करता आल्या नाहीत.   

सरासरी क्षेत्र (कंसात पेरणी झालेले क्षेत्र) भात ः ७८८३ (२२४), बाजरी ः १,८२,६३१ (४२,२००), रागी ः २९१२ (१९५), मका ः ५३,१४१ (१७,६२९), इतर तृणधान्ये ः ११,८७८ (१४८), तूर ः १२,०१८ (१३,०३७), मूग ः ९२५८ (९२५४), उडीद ः ८२२० (९३२३), इतर कडधान्य ः १०,१३३ (१९६२), भुईमूग ः ४४२० (१४३६), तीळ ः ४५७ (८४), कारळे ः ३६०५ (३१८), सोयाबीन ः ५८,२८२ (१४,२५५), इतर तेलबिया ः ५१४८(०), कापूस ः १,०५,४२७ (६०,४४१).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com