जत पूर्व भागात दुष्काळाच्या झळा वाढल्या

सांगली: जत पूर्व भागात दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या आहेत. उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. संख, दरीबडची, अंकलगी, सोन्याळ, सिध्दनाथ परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
Drought spike in Jat East
Drought spike in Jat East

सांगली : जत पूर्व भागात दुष्काळाच्या  झळा वाढू लागल्या आहेत. उन्हाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. त्याची तीव्रता वाढत आहे. कमी झालेला पाऊस, परतीच्या अवकाळी पावसाने दिलेली दडी, कोरड्या पडलेल्या कूपनलिका, घटलेली पाण्याची पातळी, वाढत्या उन्हाची तीव्रता, यामुळे पूर्व भागातील संख, दरीबडची, अंकलगी, सोन्याळ, सिध्दनाथ परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. कूपनलिका, विहीरी कोरड्या पडल्या आहेत. लोकांना संचारबंदी लागू असल्याने बाहेर पडता येत नाही. पाण्यासाठी हाल होत असून द्राक्षबागांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. 

तालुक्यात ‘कोरोना’च्या संकटाबरोबर दुष्काळाच्या झळा वाढत आहेत. यंदा परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु पूर्व भागातील संख , माडग्याळ, दरीबडची, सोन्याळ, उटगी, जाडरबोबलाद, गुड्डापूर, व्हस्पेठ, कुलाळवाडी, सिध्दनाथ, अंकलगी, गोंधळेवाडी, जालिहाळ खुर्द, आसंगी(जत), तिल्याळ, लमाणतांडा (दरीबडची लकडेवाडी, कुलाळवाडी या १७ गावांत पावसाने दडी दिली होती. त्यामुळे या भागात दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे. 

तालुक्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र, गेल्या चार वर्षांपासून जमिनीतील पाण्याची पातळी घटल्याने याचा परिणाम जाणवत आहे. पाण्याअभावी परिसरातील स्त्रोत आटू लागले आहेत. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. गोंधळेवाडी, अंकलगी, माडग्याळ सोन्याळ येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अंकलगी, सोन्याळ, गोंधळेवाडी या गावात टँकर सुरु आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना अर्धा-एक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

दरम्यान, तालुक्यात २०२० मधील १ कोटी ६४ लाख रुपये खर्चाचा टंचाई आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यात १३ गावे ४५ वाड्या-वस्त्यांवर आवश्यकता भासेल. एप्रिल ते जून २० गावे १४४ वाड्या-वस्तीवर पिण्याचे पाणी पुरवावे लागेल, असा अंदाज आहे. माडग्याळ येथील वाड्या-वस्तीवर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली आहे. टँकर सुरु झाल्यास पाण्याची समस्या दूर होईल.  डाळिंब, द्राक्ष बागेला पाण्यावर खर्च  

पाण्याची टंचाईमुळे डाळिंब व द्राक्ष बागा संकटात सापडणार आहेत. सध्या डाळिंब, द्राक्ष हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानंतर द्राक्ष बागेची खरड छाटणी सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील हंगामाच्या फळासाठी द्राक्षाच्या काड्या तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता भासेल. द्राक्षबागा कशा जगवायच्या ? हा प्रश्न उभा राहिला आहे. काड्या तयार करण्यासाठी टॅंकरने पाणी आणावे लागणार आहे. कूपनलिका, विहीर खुदाईवर शेतकरी खर्च करीत असल्याची स्थिती आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com