नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात शेतकरी आत्महत्या

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात शेतकरी आत्महत्या
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात शेतकरी आत्महत्या

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके शासनाने दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू केल्या असल्या, तरी वाढत्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र थोपविण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे उभे ठाकले आहे. विशेष करून मालेगाव, बागलाण, दिंडोरी व निफाड तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या लागोपाठ होणाऱ्या आत्महत्यांमुळे सरकारच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, आत्महत्या करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र या दुष्काळी उपाययोजनेत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

नोव्हेंबरअखेर जिल्ह्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, जानेवारीपासून दरमहा सरासरी आठ ते दहा शेतकरी आपली जीवनयात्रा संपवीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये साधारणतः २२ ते ४५ वयोगटातील शेतकऱ्यांचा समावेश चिंताजनक आहे. शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या विचार करायला लावणारी असली, तरी अशा आत्महत्यांमागची कारणेदेखील तितकीच विचार करायला लावणारी आहेत.

कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून एक लाखाची आर्थिक मदत दिली जात असून, अशी मदत देताना शेतकऱ्याच्या नावावर शेती, सावकार अथवा बॅँकांचे कर्ज असल्याची खात्री केली जाते.

पोलिस, महसूल व कृषी विभागाकडून सर्वंकष चौकशी केली जात असल्याने एकूण ८९ शेतकऱ्यांपैकी फक्त २६ शेतकऱ्यांनीच कर्जबाजारीपण व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ४९ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांमागे वैैयक्तिक कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात प्रामुख्याने नैराश्य, घरगुती भांडणे, व्यसन अशा कारणांमुळे आत्महत्या झाल्याचे सरकारी अहवालात म्हटलेले आहे.

आत्महत्येच्या १४ घटनांची चौकशी अद्यापही सुरू आहे. सर्वाधिक आत्महत्या मालेगाव, दिंडोरीपाठोपाठ बागलाण तालुक्यात झाल्या आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर करताना पहिल्या टप्प्यातून दिंंडोरी तालुक्याला वगळले होते. नंतर काही मंडळांचा समावेश करण्यात आला. निफाड तालुक्यात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही या तालुक्याला दुष्काळापासून वंचित ठेवण्यात आले. दुष्काळी येवला, चांदवड, देवळा या तालुक्यांत मात्र शेतकरी आत्महत्यांची संख्या अगदीच अल्प आहे. पेठ व सुरगाणा तालुक्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. नोव्हेंबरअखेरच जिल्ह्यात चारा, पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यात आत्महत्यांच्या वाढत्या सत्राने भर पडली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com