खानदेशातील चाराटंचाई दिवसेंदिवस बिकट

खानदेशातील चाराटंचाई दिवसेंदिवस बिकट
खानदेशातील चाराटंचाई दिवसेंदिवस बिकट

जळगाव : खानदेशात चाराटंचाईची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. माळरानावर चाराच नाही. यातच परराज्यातील, परजिल्ह्यातील पशुधन जिल्ह्यात दाखल झाले आहे. त्यांचा वाटाही माळरान व शिवारातील उलंगवाडी झालेल्या शेतांमध्ये वाढला आहे. यासंदर्भात गुराखी, शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

चारा महागत आहे. कारण चाऱ्याचे उत्पादन कमी झाले. ज्वारी, बाजरीचा चारा खरिपात आला नाही. सद्यःस्थितीत बाजरीचा चारा मिळणे दुरापास्त आहे. ज्वारीचा कडबा प्रतिशेकडा ४००० रुपयांपर्यंत आहे. गावातील भाकड, लहान जनावरे घरी चारा टाकून पोसणे शेतकऱ्यांना अधिक खर्चाचे असते. यामुळे शेतकरी हे पशुधन गावातील गुराख्यांकडे रोज चराईसाठी पाठवितात. गुराखी त्यांना माळरान व गावच्या उलंगवाडी झालेल्या शेतांमध्ये चराईसाठी घेऊन जातात. परंतु शिवारात परजिल्ह्यातील शेळी, मेंढीपालक, पशुधन पालक आले आहेत. त्यांचा मुक्काम शेतातच असतो. त्यांचे पशुधन पूर्णतः शिवारातील चाऱ्यावर, उलंगवाडी झालेल्या केळी, कापूस व इतर पिकांच्या शेतात चरते. या पशुधनाची संख्या मोठी असते. यामुळे गावातील पशुधनाला पुरेसा चारा मिळत नाही. गुराख्यांना लांब अंतरावर जावे लागत असल्याची स्थिती आहे.

पशुधनाला चराईसाठी शिवारात अपेक्षित चारा नाही. बाहेरील पशुधन केळी व इतर पिकांचे नुकसानही करते. यावल तालुक्‍यात असे प्रकार वाढले असून, या पशुधनपालकांना दंडही ठोठावले जात आहेत. स्थानिक आणि बाहेरील पशुधनपालक यांच्यातील वाद वाढले आहेत. यंदा पाऊस कमी झाल्याने चाऱ्याची समस्या आहे. त्यातच बाहेरील पशुधनपालकांची संख्या जिल्ह्यात यावल, रावेर, चोपडा, जळगाव, पाचोरा भागांत वाढत असल्याने पुढे स्थानिक पशुधनाला पुरेसा चाराच राहणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com