सांगली जिल्ह्यात पावसाअभावी आॅक्टोबर छाटणी रखडली

पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी द्राक्ष छाटणी झाली आहे
पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी द्राक्ष छाटणी झाली आहे

सांगली : जिल्ह्यातील द्राक्षपट्ट्यात पावसाने ओढ दिली आहे. याचा फटका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे. दरवर्षी ऑगस्टपासून द्राक्षबागांच्या छाटणीला सुरवात होते. मात्र, यंदा ऑक्‍टोबर महिना सुरू झाला, तरी अद्यापही छाटणीला प्रारंभ झालेला नाही. शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस वेळेत झाला नाही, तर द्राक्ष हंगाम लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात सव्वा लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेतले जाते. तासगाव, पलूस, कवठेमहांकाळ, विटा, मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत. मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पाऊस बरसला. मात्र नंतर त्याचा जोर ओसरत गेला. जुलैचा उत्तरार्ध व ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील तासगाव, जत, मिरज या तालुक्‍यांत पावसाने उघडीप दिली. पलूस, कडेगाव तालुक्‍यांत काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, सप्टेंबर महिन्यापासून पूर्णपणे पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्‍यातील तलाव कोरडे पडले आहेत. विहिरी व बोअरवेलमधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यात ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू झाल्या आहेत. मात्र, कृष्णा नदीची पाणीपातळी कमी असल्याने या योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होत नाहीत. म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झालेली नाही. त्यामुळे छाटणीला पाणी तरी कोठून आणायचे या चिंतेत द्राक्ष बागायतदार आहेत.

गेल्या वर्षी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाला होता. मात्र, या वर्षी चित्र वेगळे निर्माण झाले आहे. पाऊस नसल्याने छाटणी थांबली आहेत. परतीचा पाऊस वेळेत झाला नाही, तर टॅंकरद्वारे बागेला पाणी देऊन द्राक्ष उत्पादन घेण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. छाटणी उशिरा झाल्यास यंदाच्या हंगामात द्राक्ष हंगाम पुढे जाणार आहे.

परिमाणी एकाच वेळी द्राक्षे बाजारपेठेत दाखल होतील. यामुळे दराची स्थिती काय होईल याचा अंदाज मात्र, सध्या तरी सांगता येत नसल्याचे असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या जिल्ह्यातील भूजलपातळी खालावली आहे. द्राक्षबागेची छाटणी केल्यानंतर बागांना दररोज सरासरी दहा ते बारा हजार लिटर पाणी द्यावेच लागते. जर उष्णता जास्त असेल यात वाढ करावी लागते. द्राक्ष हंगाम संपेपर्यंत शेततळी, विहिरींमध्ये पाण्याची उपलब्धता पाहूनच छाटणी केली जाते. ठिबक सिंचन वापरूनही यंदा पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्‍यता आहे. यामुळे सप्टेंबरमध्ये छाटणी करणाऱ्या द्राक्ष उत्पादकही पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत.

शेततळे भरून घेण्याचे नियोजन जिल्ह्यात काही भागांमध्ये कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा उपयोग शेततळी भरून घेण्यासाठी शेतकरी करीत आहे. प्रत्येक वर्षी अनेक शेतकरी टॅंकरने पाणी आणून बागा जगवतात. मात्र, कृष्णा नदीत पाणीपातळी कमी असल्याने टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. त्यामुळे लाभ क्षेत्रात पाणी येण्यास विलंब होत आहे. पाणी आले, की शेतकरी शेततळे भरून घेण्याचे नियोजन करू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com