अतिपावसाचा कारखान्यांच्या गळितावर परिणाम शक्‍य

अतिपावसाचा कारखान्यांच्या गळितावर परिणाम शक्‍य
अतिपावसाचा कारखान्यांच्या गळितावर परिणाम शक्‍य

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील पश्‍चिम भागात अति पाऊस झाल्याने या भागातील उसाची वाढ थांबली आहे. यातच तांबेरा, माव्याचा प्रादुर्भाव झाल्याने याचा फटका पश्‍चिम भागातील कारखान्यांच्या गळीतावर होणार आहे. पश्‍चिम भागातील अपेक्षित ऊस उत्पादनात सुमारे पन्नास टक्क्‍यांची घट येण्याची भिती व्यक्त होत आहे. तर रिकव्हरीतही एक टक्‍यापर्यंत घट येण्याची शक्‍यता असल्याने उसाच्या गळीतावरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

पश्‍चिम भागातील कारखाने अडचणीत येणार? जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर उसाचे पीक आहे. सर्वाधिक क्षेत्र हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यात असले तरी चाळीस टक्क्‍यांपर्यंतचे क्षेत्र हे पश्‍मिमेकडील भागात आहे. गगनबावडा, आजरा, चंदगड, राधनगरी, पन्हाळा, कागल, भुदरगडसह करवीरमधील निम्याहून अधिक भाग गेल्या दोन महिन्यांपासून अतिपावसाच्या छायेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या भागात सूर्यदर्शनच झाले नाही. सातत्याने असणारे ढगाळ हवामान व संततधार पाऊस यामुळे उसाच्या शिवारांना तळ्याचे स्वरुप आले आहे. महिनाहून अधिक काळ पाणी शेतात साचून राहिल्याने सर्व प्रकारच्या उसावर मोठा गंभीर परिणाम झाला आहे. वाफसा नसल्याने उसाची वाढच थांबली आहे. यामुळे सगळा ऊस पिवळा आणि केवळ काड्याच्या स्वरूपात दिसून येत आहे.

रिकव्हरीचा धसका उत्पादनात घट निश्‍चित असली, तरी रिकव्हरीही घटण्याची शक्‍यता असल्याने कारखान्यांच्या अर्थव्यस्थेसीही याचा गंभीर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. अतिपावसामुळे शेतकऱ्यांना बियाणे देण्यासाठी प्लॉट उरले नाहीत यामुळे सभासदांना लागवडीसाठी ऊस देण्यासाठीही कारखान्यांना झगडावे लागत असल्याची स्थिती सध्या कारखाना पातळीवर आहे. उसाची चांगली वाढ झाली नसल्याने रिकव्हरीत सुमारे अर्धा ते एक टक्का घट येईल, अशी भीती कारखानदारानी व्यक्त केली.

संततधार पावसामुळे मुळांना प्रकाश संश्‍लेषणातून अन्नघटक मिळणे दुरापास्त झाल्याने मुळाची वाढ थांबली आहे. परिणामी उसाची वाढ खुंटली आहे. पश्‍चिम भागातील बहुतांशी तालुक्‍यात ही स्थिती सातत्याने असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट निश्‍चित आहे. - डॉ. अशोक पिसाळ,  कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय कोल्हापूर

आमच्याकडे येणाऱ्या उसात नोंदणीपेक्षा पन्नास टक्के कमी ऊस येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अजूनही आमच्या भागात पाऊस थांबलेला नाही. यामुळे येणाऱ्या हंगामात कसे नियोजन करायचे याबाबत आमच्या बैठका सुरू आहेत. - सुनील पाटील, ऊस विकास अधिकारी, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना असळज, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com