परभणी ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवडलेल्या जिल्ह्यातील ७ हजार ९७९ शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी २२ कोटी ३३ लाख रुपये अनुदान देण्यात आले. परंतु अद्याप २ हजार २०५ शेतकऱ्यांचे ६ कोटी ८० लाख रुपये अनुदान रखडलेलेच आहे.
‘पोकरा’अंतर्गंत तीन टप्प्यांत जिल्ह्यातील २७५ गावांतील निवड झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील १९१ गावांमध्ये सूक्ष्म नियोजनाची प्रक्रिया सुरु आहे. गावविकास आराखडे तयार केल्यानंतर अंमलबजावणी सुरु होईल. आजवर नऊ तालुक्यांतील एकूण ४५ हजार १६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. १ लाख शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट आहे. विविध घटकांच्या लाभासाठी एकूण १ लाख २५ हजार ५१३ अर्ज केले आहेत. त्यापैकी ३९ हजार ९८७ अर्जांची सत्यता तपासण्यात आली.
टप्पा क्रमाक (ग्रामसंजीवनी समितीची मंजुरी) ते टप्पा क्रमांक सातपर्यंतच्या विविध टप्प्यांवर एकूण २० हजार ६२९ अर्ज प्रलंबित आहेत. जानेवारीपर्यंत अनुदानासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या एकूण ७ हजार ९७९ शेतकऱ्यांना २२ कोटी ३३ लाख रुपये अनुदान वाटप केले.
शेतकऱ्यांनी पदरमोड करून कर्ज घेऊन विविध घटकांची कामे पूर्ण केली. अनुदानासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. परंतु अद्याप २ हजार २०५ शेतकऱ्यांचे ६ कोटी ८० लाख रुपयाचे अनुदान रखडले आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात २७ समूह सहाय्यकांची नियुक्ती केली आहे.
एका समूह सहायकाकडे ८ ते १० गावे आहेत. नवीन सरपंचांची निवड झालेल्या अनेक ग्रामपंचायतींत ग्रामसंजीवनी समित्या स्थापन करण्यास वेळ लागत आहेत. त्यामुळे अर्जांना पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया रखडली आहे.
‘पोकरा’अंतर्गंत कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. लवकरच लाभार्थींना अनुदान वाटप होईल. - संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, परभणी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.