काढणीपश्चात टिकवण क्षमतेवर परिणाम करणारे घटक

elements which effects on post harvested agriculture produce
elements which effects on post harvested agriculture produce

भाजीपाला पिकांमध्ये अधिक काळ साठविण्यावर अनेक घटकांचा परिणाम होतो. असे परिणाम करणारे घटक जाणून त्यासाठी योग्य ते नियंत्रणाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. भाजीपाला काढणीपूर्वीचे घटक

  • भाजीपाला काढणीनंतरची टिकवण क्षमता बऱ्याचशा काढणीपूर्वीच्या घटकांवर अवलंबून असते. यामध्ये प्रामुख्याने लागवड केलेला वाण, वातावरणीय घटक, सिंचनाची सुविधा, खते, रोग व कीड व्यवस्थापन हे घटक परिणाम करतात. खालील भाजीपाला काढणीपूर्वीचे घटक टिकवण क्षमतेवर परिणाम करतात.
  • हवामान प्रकाश तीव्रता

  • प्रकाशाची तीव्रता प्रामुख्याने फळे व भाजीपाल्याच्या पौष्टिकतेवर परिणाम करते. लागवडीचा हंगाम व लागवडीची जागा क जीवनसत्त्वावर परिणाम करते. सर्वसाधारण प्रकाशाची तीव्रता जर कमी असेल तर भाजीपाल्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व कमी प्रमाणात उपलब्ध असते.
  • तापमान

  • उष्ण व थंड अशा दोन्ही तापमानाचा भाजीपाल्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. कमी तापमानामुळे थंड हवामानात वाढणाऱ्या पिकांमध्ये (उदा. कोबी, फ्लॉवर, मुळा, गाजर, लेटूस इ.) अवेळी/लवकर फुलोरा येतो, त्यामुळे टिकवण क्षमता घसरून उत्पादनात घट होते, तर अधिक तापमानामुळे मिरची, ढोबळी मिरची यांमध्ये परागीभवनावर परिणाम होतो. कमी तापमानामुळे टोमॅटोला सामान्य रंग येत नाही, मात्र गाजर व बीट यांना चांगला रंग येतो. जर तापमान २७ अंश.से.च्या वर गेले तर टोमॅटोला सामान्य लाल रंग येत नाही, तर ब्रोकोली व लेटूस यांची चव बदलते.
  • वारा

  • जोराच्या वाऱ्यासोबत मातीचे कण येतात. पीकवाढीच्या काळात जोराचा वारा असेल तर झाडाची पाने फाटणे, झाड वाकणे यांसारखे परिणाम दिसून येतात, त्याचबरोबर वाऱ्यासोबत आलेले मातीचे कण पाने व फळांवर आदळतात, त्यामुळे फळांना व पानांना इजा होते. अशा ठिकाणी जीवाणूंची वाढ होऊन भाजीपाल्याची टिकवण क्षमता कमी होते.
  • पाऊस

  • टोमॅटो, ढोबळी मिरची, खरबूज यांच्या फळवाढीच्या काळात जर मोठ्या प्रमाणावर पाऊस असेल तर फळ तडकण्याचे प्रमाण वाढून रोगकारक शक्तींचे प्रमाण वाढते. तसेच पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने पालेभाज्यांची गुणवत्ता घसरून टिकवण क्षमता कमी होते.
  • लागवडीची पद्धती झाडांची संख्या

  • कोणतेही पीक लागवडीच्या वेळेस झाडांची संख्या योग्य राखणे फार महत्त्वाचे असते. झाडांच्या संख्येवर उत्पादन क्षमता व गुणवत्ता अवलंबून असते. जर झाडांचे प्रमाण खूपच कमी असेल तर परागीभवनावर परिणाम होऊन फळांची गुणवत्ता घसरते. हेक्टरी झाडांच्या प्रमाणावर उत्पादनाचे आकारमान अवलंबून असते. कोबीमध्ये जर झाडांची संख्या कमी असेल तर गड्ड्यांचा आकार मोठा होतो. बीट, कांदा, गाजर यांमध्ये जर हेक्टरी झाडांची संख्या जास्त असेल तर उत्पादनाचा आकार लहान राहतो.
  • सिंचन व्यवस्था

  • नियमित व प्रमाणित पाणी पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असते. जर पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले तर उत्पादनाची गुणवत्ता कमी होऊन टिकवण क्षमता कमी होते.
  • जास्त पाण्यामुळे होणारे परिणाम

  • झाड किंवा फळ अधिक फुगीर बनून फळावरील मऊपणा नष्ट होतो व फळ उशिरा पिकते.
  • टोमॅटो व खरबूज यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.
  • फ्लॉवरच्या उभ्या पिकात २४ तासांपेक्षा जास्त पाणी साचून राहिल्यास टिकवण क्षमता कमी होते.
  • पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम

  • पाणी कमतरतेच्या वेळेस सूर्यप्रकाशाच्या अधिक तीव्रतेमुळे फळांना इजा होते, तर फळे समप्रमाणात पिकत नाही.
  • फळांचे आकारमान घटते व फळांची वाढ पूर्ण होण्याआधीच पिकण्यास सुरुवात होते.
  • संपर्क - डॉ. संजूला भावर, ८६००३४४०९७ (विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र खामगाव अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com