नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे लावण्यावर भर

गेल्या दोन वर्षांतील दुष्काळाची परिस्थिती पाहता यंदा फळबाग लागवडीला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून सीताफळ, आंबा, पेरू, लिंबू, बोर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कमी पाण्यात ही झाडे जगत असल्याने त्याकडे कल असल्याचे दिसते. - विलास नलगे,कृषी उपसंचालक, नगर सततच्या दुष्काळानेशेतकरी त्रस्त आहेत. अन्य पिकांपेक्षा फळझाडे तग धरतात. शिवाय फळांना दरही चांगला मिळतो. त्यामुळे आंबा, पेरू, सीताफळाची साधारण अकरा एकरवर लागवड केली आहे. - दत्तात्रय सदाफुले,चिचोंली पाटील, जि. नगर
Emphasis on planting low water fruit trees in Nagar districts
Emphasis on planting low water fruit trees in Nagar districts

नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना शेतीचे नुकसान झाले. मात्र, काही प्रमाणात फळबागांनी तारले. अन्नधान्यापेक्षा फळांना दरही चांगला मिळत असल्याने यंदा दुष्काळी भागात कमी पाण्यावर तग धरणाऱ्या फळझाडांच्या लागवडीला प्रधान्य दिले जात आहे. त्यात जिल्ह्यामध्ये सीताफळ, आंबा, पेरूच्या लागवडीवर भर आहे. 

जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता सातत्याने दुष्काळ आणि पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्यावर्षी गंभीर दुष्काळाशी सामना करावा लागला. सलग दोन वर्षे शेतपिके आली नाही. जी आली त्यांना दर मिळाला नाही. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला.

गतवर्षीच्या दुष्काळात पाणी न मिळाल्याने काही प्रमाणात फळबांगाचेही नुकसान झाले, मात्र अन्य पिकांच्या तुलनेत फळपिकांचे आर्थिक नुकसान कमी होते. शिवाय काही ठिकाणी अल्प पाण्यावर शेतकऱ्यांनी फळबागा जगवल्या. दुष्काळ व पाणी टंचाईसारख्या गंभीर संकटावर मात करताना फळबागा तरू शकतात, असा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला.  

जिल्ह्यामध्ये सध्या ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागा आहेत. सलग सहा ते सात महिने पाणीच मिळू शकले नाही, अशा साधारण पंधरा ते वीस हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा जळाल्या. मात्र कमी पाण्यात तग धरणाऱ्या सीताफळ, आंबा, पेरूच्या बागा वाचवता आल्या आहेत. कृषी विभागाकडे आत्तापर्यंत सात हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी फळबागा लागवडीची मागणी केली आहे.

यंदा शासनमान्य खासगी रोपवाटिकांतून फळझाडे लागवडीला रोपे घेण्यासाठी देण्यात येणारे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देणे कृषी विभागाने बंद केले आहे. तरीही आत्तापर्यंत २२७१ हेक्टरवर लागवड केल्याची माहिती दिली.

कृषी विभाग विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणांना अनुदानावर लागवड करण्याला परवानगी देते. मागणी असलेल्या सीताफळ, आंबा, पेरू यासह अन्य फळझाडांच्या काही वाणांची विद्यापीठाने शिफारस केलेली नसली, तरी उत्पादन चांगले असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अनुदानाची आशा न धरता स्वखर्चाने जवळपास एक ते दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड केल्याचा अंदाज आहे. बहुतांश लागवडी दुष्काळी भागात झाल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com