रानभाज्या विक्रीतून रोजगार निर्मितीचा उद्देशः कृषिमंत्री भुसे 

राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने पिकत असलेल्या रानभाज्यांचा मेवा हा मोठा ठेवा आहे. हा रानमेवा ग्राहकांसमोर आणून विक्रीतून रोजगार निर्मिती हा प्रमुख उद्देश आहे.
agri minister
agri minister

नाशिक: राज्यातील आदिवासी भागात नैसर्गिक पद्धतीने पिकत असलेल्या रानभाज्यांचा मेवा हा मोठा ठेवा आहे. हा रानमेवा ग्राहकांसमोर आणून विक्रीतून रोजगार निर्मिती हा प्रमुख उद्देश आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.  जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी विभागातर्फे आयोजित 'रानभाज्या महोत्सव'चे नाशिक येथे रविवारी(ता.९) उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. भुसे बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हेमंत टकले, देवयानी फरांदे, कृषी समितीचे सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, आत्मा प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे यांसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  या वेळी श्री. भुसे म्हणाले कि, आरोग्यवर्धक आहार म्हणून राजभाज्यांचे महत्व आहे. त्यास प्रतिष्ठा मिळवून देण्यासह आदिवासी बांधव ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. या ठेव्याचे संवर्धन करावे. या वेळी कृषिमंत्र्यांनी विविध ठिकाणी भेट देत माहिती घेतली.  ‘‘भाज्यांची वैशिष्ट्ये, चव, आरोग्य मूल्य व पाककृती सादर करून वेगळा उपक्रम झाला आहे. आता कार्यक्रम नव्हे तर नियमित व्यावसायिक स्वरूप द्यावे,असे श्री.मांढरे यांनी नमूद केले.जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या माध्यमातून विक्री व्यवस्था उभी,’’ असे श्रीमती बनसोड यांनी सांगितले.  बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री. पडवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी सूत्रसंचालन केले. रानभाज्या माहिती घडीपत्रिका व पाककृती पुस्तिका यांचे विमोचन यावेळी करण्यात आले. सौ. विमल जगन आचारी यांचा सन्मान करून प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  या महोत्सवात ३६७ प्रकारच्या फळ,पाला,कंद व फुलवर्गीय रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले होते. तर ५०हुन अधिक प्रकार विक्रीसाठी होत्या. यासह विविध पाककृती तयार करून दाखविण्यात आल्या. सामाजिक अंतर पाळून रानभाजी खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद दिला. नाशिक व धुळे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र नाशिक व मालेगाव, आयुर्वेद सेवा संघ, आत्मा यांचे सहकार्य लाभले.  शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय देण्याचा प्रयत्न  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये 'उत्पादक ते ग्राहक' साखळी मजबूत करण्यासाठी शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक घटक पुढे येतात, मात्र त्याची पडताळणी करून शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी काळजी घेणार. शेतकरी मेहनत खूप घेतात, मात्र ती पैशात रूपांतरित झाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मंत्री भुसे म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com