सातारा ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ३८१ कामे सुरू आहेत. त्यावर २२५९ मजूर काम करीत आहेत. खटाव तालुक्यात २५ कामांवर सर्वाधिक ४०६ मजूर काम करीत असल्याची माहिती रोजगार हमी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील १०२ ग्रामपंचायतींच्या वतीने मनरेगांतर्गत कामे सुरू आहेत. या कामांमध्ये विहीर पुनर्भरण, शेततळे, इंदिरा आवास घरकुल, वृक्ष लागवड, विहीर खोदाई, शोषखड्डे, फळबाग लागवड आदी प्रकारच्या कामांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील जावळी तालुक्यात ४२ कामांवर २०७ मजूर, कऱ्हाड तालुक्यात १९ कामांवर ९८ मजूर, खंडाळा तालुक्यात १२ कामांवर १०१ मजूर, खटाव तालुक्यात २५ कामांवर ४०६ मजूर, कोरेगाव तालुक्यात ७७ कामांवर ३९१ मजूर, महाबळेश्वर तालुक्यात ६० कामांवर २६३ मजूर, माण ९ कामांवर १०७ मजूर, पाटण तालुक्यात ४२ कामांवर २९४ मजूर, फलटण तालुक्यात ५४ कामांवर १८० मजूर, सातारा तालुक्यात २६ कामांवर १५३ मजूर, वाई तालुक्यात १५ कामांवर ५९ मजूर कार्यरत आहेत.