गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा पत्रकी असलेली कूळ शेतकऱ्यांची नावे संगणकीय उताऱ्यावर नोंद करावीत, अशी मागणी चंदगड तालुक्यातील चनेहट्टी, राजगोळी, गणेशवाडी, राजेवाडी, राजगोळी खुर्दच्या शेतकऱ्यांनी फेरी काढून प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे केली आहे.
दसरा चौकातील शिवाजी पुतळ्यापासून फेरी काढून सर्व शेतकरी प्रांत कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी वाघमोडे यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे, की या गावातील शेतकरी हे वाडवडीलांपासून इनाम असलेल्या जमिनी कसत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच चालतो. या जमिनी शेतकऱ्यांच्याच ताब्यात आहेत. या जमिनीचे संगणकीय सातबारा उतारा करताना इतर हक्कातील कुळांची नावे रद्द केली आहेत. जमिनीच्या मूळ मालकाने पोकळ नाव नोंद असल्याचा फायदा घेऊन जमिनी कुळांना कल्पना न देता परस्पर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना विक्री करीत आहेत. यामुळे जमिनीचे कब्जेधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
काही गुंड प्रवृत्तीचे लोक शेतकऱ्यांना धमकावत असल्याने बऱ्याच कुटुंबांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यातूनच काही शेतकऱ्यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी चंदगड तहसीलदारांना कुळांची नावे सातबारा पत्रकी नोंद करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तहसीलदारांकडे मागणी अर्जही दाखल केला आहे. त्यावर तहसीलकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही. यामुळे संबंधित शेतकरी कुटुंबात असंतोष वाढलेला आहे. तसेच यापूर्वीही तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले होते. त्या वेळी तहसीलदारांनी योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही दिली होती. त्याचीही पूर्तता झालेली नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.