मोहोळ, जि. सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात मोहोळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून पहिल्या टप्प्यातील २१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. सध्या याद्या पडताळणीचे काम सुरू आहे. ते होताच येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली. मोहोळ तालुक्यात १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे नद्या, ओढे, बंधारे यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. या संकटामुळे दोन दिवसांतच शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. अनेक दुभती जनावरे वाहून गेली. ज्यांना दावणीवरून सुटता आले नाही, अशांचा जागेवरच मृत्यू झाला. तर घरात पाणी शिरल्याने अनेक घरे जमीनदोस्त झाली होती. दरम्यान, तहसीलदार जीवन बनसोडे यांनी विविध विभागातील १७५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून बाधितांचे तातडीने पंचनामा करण्याचे काम हाती घेतले. सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात जिरायत, बागायत मिळून २३ हजार हेक्टर, तर विविध फळबागांचे ८ हजार हेक्टरवरील नुकसान झाले आहे. बागायतीमध्ये ऊस, मका, सोयाबीन आदींसह अन्य पिकांचा समावेश आहे. फळबागांमध्ये डाळिंब, सीताफळ, द्राक्ष आदींचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्यांना ६३ लाख रुपयांची मदत त्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहेत. तालुक्यात झालेल्या नुकसानीसाठी ४५ कोटींचा मदतीचा आराखडा तयार करून शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील २१ कोटी प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.