राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझे

यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या वर्षीचा साखरेचा साठा कमी राहणार असला तरी देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात जादा साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.
हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझे Excess sugar burden on the season this year
हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझे Excess sugar burden on the season this year

कोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या वर्षीचा साखरेचा साठा कमी राहणार असला तरी देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात जादा साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. यामुळे राज्यातील कारखान्यांना पुढील हंगामाचे स्वागत जादा साखरेचे ओझे घेऊनच करावे लागणार आहे. यंदा उत्पादित साखरेपैकी जवळजवळ निम्मी साखर शिल्लक असल्याने या साखरेचे करायचे काय, असा प्रश्‍न राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांना भेडसावत आहे.  देशात साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी ८७ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज आहे. यापैकी ५० ते ५१ लाख टन साखर फक्त महाराष्ट्रातील शिल्लक राहील, असे चित्र दिसते. यावरूनच महाराष्ट्रात गेल्या वर्षी साखर विक्री कमी झाल्याचे दिसून येते. २०२०-२१ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्यात ४० लाख टन साखर शिल्लक होती. यात यंदा १०६ लाख टन साखर उत्पादित झाली. १४६ लाख टन साखर राज्यात होती. यापैकी सुमारे ३५ लाख टन साखर राज्यातून निर्यात झाली.  सुमारे ३५ लाख टन साखरेची देशांतर्गत बाजारात विक्री झाली. साधारणतः ७० लाख टनांपर्यंत साखर यंदाच्या हंगाम समाप्तीवेळी शिल्लक होती. हंगाम सुरू होईपर्यंत १५ ते २० लाख टन साखर विक्री गृहीत धरल्यास किमान ५० लाख टन साखर शिल्लक राहिला, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे.  यंदा लॉकडाउनचे तर कारण झालेच, परंतु उत्तर प्रदेशने पूर्व ईशान्येकडील बाजारपेठ काबीज केल्याने त्यांनी उत्पादित बहुतांशी साखर त्या भागात विकली. वाहतूक खर्च जादा होत असल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अन्य राज्यात साखर विकणे दुरापास्त झाले, यामुळे साखरेचा उठाव कमी झाला. परिणामी, साखरेची विक्री ठप्प झाली. राज्याच्या तुलनेत उत्तर प्रदेश मध्ये मात्र साखरेची विक्री चांगली झाल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. वाहतूक अनुदान निर्णय प्रलंबितच  कारखान्यांना साखर वाहतुकीसाठी प्रोत्साहन म्हणून साखरेला प्रतिक्विंटल शंभर रुपये वाहतूक अनुदान देण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तालयाने राज्य शासनापुढे एप्रिलमध्ये ठेवला होता. हे अनुदान मिळाल्यास राज्यातील साखर कारखान्यांना जलद गतीने साखर देशभरात विक्री करणे शक्य होईल, असा अंदाज आयुक्तालयाचा होता पण अद्यापही यावर शासनाने निर्णय घेतला नाही. कोरोना परिस्थितीमुळे याबाबतच्या निर्णयाला विलंब लागत असल्याचे आयुक्तालय सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया यंदाच्या हंगामात कारखान्यांना गेल्या वर्षीची शिल्लक साखर आव्हानात्मक ठरणार आहे. विविध कारणांमुळे कारखान्यांना अपेक्षित साखर विकता आली नाही याचे ओझे यंदा नक्की जाणवेल. शिल्लक जलद गतीने विक्री होण्यासाठी तातडीने काही निर्णय अपेक्षित आहेत.  - विजय औताडे, साखर तज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com