गोंदिया ः पीककर्ज परतफेडीची मुदत मंगळवार (ता. ३१) पर्यंत आहे. परंतू ‘कोरोना’मुळे सध्या सर्वदूर लॉकडाऊन असल्याने ही मुदत वाढवून ३० जून करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. केंद्र सरकार व ‘नाबार्ड’ला पाठविलेल्या पत्रातून त्यांनी ही मागणी केली आहे.
शेतकऱ्यांनी विविध बॅंकांमधून पीककर्जाची उचल केली आहे. या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत केल्यास त्यांना व्याजसवलत योजनेचा लाभ मिळतो. व्याज सवलत नसलेल्या शेतकऱ्यांना देखील नवे कर्ज घेण्यासाठी जुन्या कर्जाची परतफेड मंगळवार (ता. ३१) पर्यंतच करणे क्रमप्राप्त ठरते. मात्र, सध्याची स्थिती बघता शेतकऱ्यांना बॅंकेत जाऊन कर्ज भरणे शक्य नाही.
‘कोरोना’मुळे राज्यात कलम १४४ अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. इतरही निर्बंध स्थानिकस्तरावर लागू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बाहेर पडण्याची अडचण होत आहे. त्यामुळे कर्ज भरण्यासाठी असलेल्या व्याज सवलत योजनेला वाढीव कालावधी मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी अशा आशयाचे निवेदन दिले होते. त्याची दखल घेत नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, केंद्र सरकार आणि ‘नाबार्ड’ला पत्र पाठविले आहे. त्याव्दारे पीककर्ज परतफेडीस ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर केंद्र आणि ‘नाबार्ड’कडून काय निर्णय घेतला जातो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.