पिके मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून नत्र आणि पालाश शोषून घेतात. त्या मानाने कमी प्रमाणात स्फुरद आणि गंधक शोषून घेतात. अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने पिकांमध्ये त्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते.
जमिनीची सुपीकता ही तिच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. त्यासोबतच मशागतीची पद्धतही महत्त्वाची असते. उष्ण कटिबंधातील कमी पावसाच्या भागात जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे विघटन झपाट्याने होते. त्यातून सेंद्रिय पदार्थाचे भस्मीकरण वेगाने होते. अन्नद्रव्ये विद्राव्य स्वरुपात जातात. नत्रासारख्या काही अन्नद्रव्याचे वायूमध्ये रुपांतर होऊन जमिनीतून ऱ्हास होतो. परिणामी जमिनी लवकर नापीक होतात. जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे
जमिनीत असणारी अन्नद्रव्येसुद्धा निरनिराळ्या मार्गानी कमी होतात. पिके मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून नत्र आणि पालाश शोषून घेतात. त्या मानाने कमी प्रमाणात स्फुरद आणि गंधक शोषून घेतात. अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने पिकांमध्ये त्या अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. काही पिकांत गंधक आणि स्फुरदाची कमतरता दिसून येते. शेती क्षेत्रामध्ये नत्राचा ऱ्हास व अपव्यय मोठ्या प्रमाणात व अनेक प्रकारे होत असतो. यामध्ये प्रामुख्याने जमिनीची धूप हे नत्र गमविण्याचे एक कारण आहे. धूप होताना जमिनीच्या पृष्ठभागावरच्या चिकण मातीचे सुपीक कण वाहून नेले जातात. अलीकडे शेणखत वापरण्याचे प्रमाण अनेक कारणांनी कमी झाले आहे. त्यात जनावरांचे प्रमाण तुलनेने कमी होण्यासोबतच शेणाचा वापर गोवऱ्या तयार करून जळणासाठी वापरणेही ही कारणे महत्त्वाची आहेत. त्याच प्रमाणे शेणखताचा साठवण ही खड्ड्यामध्ये किंवा उघड्यावर केली जाते. पावसाळ्यात पाणी साचून राहणे किंवा निचरा होणे यामुळे या शेणखतांतून नत्राचा नाश होतो. नत्र खते दिल्यानंतर जमिनीस जास्त पाणी देऊ नये. अधिक पाणी दिल्याने नत्राचा निचऱ्याद्वारे ऱ्हास होऊ शकतो. त्याच प्रमाणे नत्र खते फेकून देण्याऐवजी जमिनीआड गाडून द्यावीत. हिरवळीची खते, निंबोळी, करंज या सारख्या पेंडी आणि पिकांचे अवशेष यांचा वापर करावा. हिरवळीच्या खतासाठी द्विदल कडधान्य वर्गातील पिकांचा वापर करावा. त्यापासून हेक्टरी ५६ ते ११२ किलो नत्र जमिनीला मिळू शकते. ग्रामीण भागातील कंपोस्ट खत शास्त्रीय पद्धतीने तयार करावे. त्यातून त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते. शेतातील पिकांचे अवशेष, काडीकचरा आणि नागरी, ग्रामीण भागातील विविध कुजणारे पदार्थ या पासून कंपोस्ट खत बनवावे. या सारख्या सेंद्रिय खतापासून अंदाजे तिसरा हिस्सा नत्र उपलब्ध होतो. निमयुक्त किंवा गंधकयुक्त आवरणे असलेल्या खतांचा वापर करावा. स्फुरद हा सर्व जमिनीत उपलब्ध असतो. जमिनीच्या पृष्ठभागालगत जितका स्फुरद असतो, त्यापेक्षा तिच्या पोटात तसेच खोलीवर स्फुरदाचे प्रमाण अगदी भिन्न असते. विम्ल चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरद ट्रायकॅल्शिअमबरोबर बद्ध असतो. जमिनीचा सामू ८ पेक्षा जास्त असल्यास, अशा जमिनीमध्ये गंधकाचे प्रमाण सेंद्रिय खतात मिसळून जमिनीस द्यावे. सामू कमी होऊन बद्ध स्वरुपातील स्फुरद पिकांना उपलब्ध होण्यास मदत होते. आम्लयुक्त जमिनीत ॲल्युमिनिअम व लोहामुळे जमिनीतील स्फुरद बद्ध होतो. तो कमी करण्यासाठी जमिनीस चुना दिल्याने बद्ध झालेला स्फुरद उपलब्ध होण्यास मदत होते. सामू आम्लकडून उदासीनतेकडे झुकण्यास मदत होते. स्फुरदाची उपलब्धता सामू उदासीन असताना (६.५ ते ७.५ दरम्यान) चांगली होते. सर्वसाधारण हंगामी पिकासाठी स्फुरद युक्त खते पेरणी करतांना द्यावीत. ती जमिनीत मुळाजवळ द्यावीत. स्फुरदयुक्त खते ही जमिनीवर फेकून देऊ नयेत. खते पेरून दिल्यानंतर मातीने पुन्हा झाकून घ्यावीत. आम्लयुक्त जमिनीत रॉक फॉस्फेटचा वापर करावा. त्यातील कॅल्शिअम ऑक्साईडमुळे सामू वाढण्यास मदत होते. लोह ॲल्युमिनिअम बरोबर बद्ध होणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण कमी होते. रॉक फॉस्फेटमधील उपलब्ध स्फुरद जमिनीमध्ये उपलब्ध होण्यास मदत होते. आम्लयुक्त जमिनीत चुन्यासारख्या भूसुधारकांचा वापर करावा. विम्लयुक्त जमिनीत जिप्सम वापरावे. अथवा चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास गंधकाचा वापर करावा. संपर्कः डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२ बाळू धारबळे, ९०९६९४४९२४ डॉ. सुनील जावळे, ९४२२१११०६१ (प्रमुख अन्वेषक, सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराडवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)