फडणवीसांनी जनतेसाठी केंद्राशी दोन हात करायला पुढे यावे ः पटोले

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील जनतेशी आपली बांधिलकी जपावी आणि केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
Fadnavis should come forward to join hands with the Center for the people: Patole
Fadnavis should come forward to join hands with the Center for the people: Patole

मुंबई : कोरोनामुळे सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारसोबत एकत्र येऊन केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन अभावी लोकांचे जीव जात आहेत, ते वाचवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रातील जनतेशी आपली बांधिलकी जपावी आणि केंद्र सरकारशी दोन हात करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. 

नाना पटोले म्हणाले, की कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आलेली असतानाही, वैद्यकीय साहित्य व परवानग्यांसाठी केंद्र सरकारकडे दाद मागावी लागते. राज्य सरकार सातत्याने केंद्र सरकारकडे रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन व लसींसाठी पाठपुरावा करत आहे. परंतु केंद्र सरकार मात्र महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याची राज्याची मागणी असताना केंद्र सरकारने फक्त २६ हजार देण्याला मान्यता दिली आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून मराठी माणसाला इंजेक्शन द्यायचे नाहीत हे बरोबर नाही. राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाचे मोल लक्षात घेतले पाहिजे. केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असताना गप्प बसून चालणार नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. या परिस्थितीत फडणवीस यांनी राज्य सरकारबरोबर एकत्र येऊन महाराष्ट्राचा आवाज बनून केंद्र सरकारकडे राज्यासाठी भांडले पाहिजे. 

रेमडेसिव्हिरचा तुडवडा असताना त्याचा काळाबाजार करणाऱ्यांसाठी दोन्ही विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना सोडवून आणतात. एवढी तत्परता या विरोधी पक्षनेत्यांनी जनतेचे जीव वाचवण्यासाठी दाखवली असती तर राज्यातील जनतेला आनंदच झाला असता. ज्या कंपनीच्या संचालकावर काळाबाजार केल्यामुळे गुजरातच्या वलसाड पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यासाठी विरोधी पक्षनेते एवढी तत्परता का दाखवतात? हा प्रश्‍न राज्यातील जनतेला पडला आहे, असेही पटोले म्हणाले. 

पटोले म्हणाले की, राज्यातील नेत्यांसारखेच केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला सापत्न भावाची वागणूक देत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत असताना केंद्र सरकारने काहीच तयारी केली नाही. उलट केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी तर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे जाहीर करून देशाची दिशाभूल केली. कोरोना संकटकाळातही गेले वर्षभर केंद्र सरकार ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरची निर्यात करत होते. 

आजही दररोज हजारो जीव जात असताना पंतप्रधान मोदी मात्र पश्‍चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेत आहेत. राजकारण, निवडणुका आणि सत्ता हेच भाजपचे पहिले प्राधान्य आहे. जनतेच्या जीविताचे त्यांना काही देणे घेणे नाही. मागील वर्षी कोरोनाची चाहूल लागताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये मोदी सरकारला कोरोनाच्या गंभीर परिणामाचा इशारा दिला होता, पण कोणाचं ऐकायचंच नाही या हिटलरशाही वृत्तीचे धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे. त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत, असेही पटोले म्हणाले. 

अब क्या रोना, लाशों का शहर देखकर  कोरोनाच्या आजच्या विदारक परिस्थितीला बेफिकीर केंद्र सरकार जबाबदार आहे याचे वर्णन नाना पटोले यांनी एका शायरीतून केले आहे.. ‘‘जब चुना ही उसे कत्ल ए आम का हुनर देखकर, तो अब क्या रोना, लाशों का शहर देखकर”! 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com