अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर) येथील शेवाळे कुटुंबाने डाळिंब, सीताफळ व पेरू या मुख्य पिकांवर आधारीत फळबाग केंद्रित शेतीचा आदर्श तयार केला आहे. प्रयोगशीलता व परिश्रम यांच्या जोरावर शेतीसह अन्य व्यवसायांचा आधार घेत समृद्धी व संपन्नता मिळवली आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत हा अवर्षणग्रस्त तालुका आहे. तालुक्यातील पाटेगाव येथील गजेंद्र मुक्ताबाई शेळगाव (ता. इंदापुर जि. पुणे) येथे रयत शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. त्यांची वडिलोपार्जित २७ एकर शेती. तालुक्यातील बहुतांश भागात सिंचनाचा कायम अभाव. त्यामुळे ज्वारी, बाजरीसारखी भुसार पिके घेतली जात. इंदापूर भागात डाळिंबाची शेती पुढारलेली होती. ती पाहून सेवानिवृत्तीनंतर गजेंद्र यांनी हेच पीक लावण्याचा निर्णय घेतला. चार एकरांवर लागवड झाली. पुढे टप्प्याटप्प्याने वाढ करत १४ एकरांपर्यत क्षेत्र नेले. परिसरातील पंचवीस गावांमध्ये मिळून डाळिंब लावणारे शेवाळे हे पहिलेच शेतकरी असावेत. फळबागकेंद्रित शेती
आज कुटुंबाच्या साऱ्या शेतीची मदार महेश, योगेश व नीलेश हे तिघे बंधू सांभाळतात. काळाची पावले व बाजारपेठांचा अभ्यास करीत त्यांनी शेतीत बदल केले आहेत. नीलेश माहीजळगाव येथे मेडिकल व ज्वेलरीचे दुकान सांभाळून शेती पाहतात. महेश यांचे कर्जतला वाहनांच्या स्पेअरपार्टचे तर योगेश यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. सर्व परिवार एकत्र नांदतो. शेतीतील उत्पन्नाचा मोठा आधार घेत परिवाराने एकोप्यातून टप्प्याटप्याने शेती खरेदी करत आपले क्षेत्र ५७ एकरांपर्यत नेले आहे. तेलकट डाग रोग, दर आदींच्या समस्यांमुळे अलीकडे डाळिंबाचे क्षेत्र कमी करीत आणले आहे. पेरू व सीताफळ ही त्यांची आजची मुख्य पिके आहेत. एनएमके गोल्ड वाणाची अडीच एकरांत सुमारे १००० झाडे. दोन वर्षांपूर्वी सहा एकरांवर नवी बाग ११ टनांपर्यंत उत्पादन मिळते. अडीचशे ग्रॅमपासून ते साडेसातशे ग्रॅमपर्यंत वजन मिळते. उत्कृष्ट गुणवत्ता असल्याने किलोला १५० रुपये, २०० ते कमाल २६०, ३०० रुपयांपर्यंत दर मिळतात. जीवामृत, गोमूत्र, शेणखताचा वापर चांगला होतो. जुलैला छाटणी करून जानेवारीच्या काळात माल आणणारे शेतकरी अत्यंत कमी आहेत. आम्ही त्यापैकीच एक असल्याचे नीलेश सांगतात. तीन एकर क्षेत्रात तैवान पिंक या गुलाबी वाणाचा पेरू घेतला आहे. सुमारे सोळा महिन्यांत तीन एकरांत ५० टनांपर्यंत उत्पादन मिळाल्याचे नीलेश सांगतात. एकूण २४ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पेरूची विक्री पुण्याला केली असून किलोला ३० ते ६० रुपये दर मिळाला आहे. या पेरूचे वर्षभरात दोन बहार घेता येतात. योग्य प्रकारे व्यवस्थापन, छाटणी या बाबी जमल्या तर वर्षभर उत्पादन घेत राहता येते. टिकवणक्षमता जास्ती असल्याने नुकसान कमी होते. विशेषतः कमी पाण्यावर येणारे पेरूचे उत्पादन दुष्काळी भागासाठी फायदेशीर आहे. अन्य पेरूच्या तुलनेत यास दर चांगला मिळत असल्याचा अनुभव आहे असे नीलेश यांनी सांगितले. डाळिंब पिकानेच प्रगती घडवल्याने हे पीक चार एकरांत टिकवले आहे. नीलेश यांच्या पेरू शेतीला आत्तापर्यंत सुमारे १३०० लोकांनी भेट दिली आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक शेतकऱ्यांनी फळबाग केंद्रित शेतीवर भर दिला आहे. पेरूची खात्रीशीर रोपेही ते शेतकऱ्यांना पुरवतात. आपल्या रोपवाटिकेचे लवकरच शासकीय प्रमाणीकरण होईल असे ते सांगतात. शेवाळे यांनी रासायनिक अवशेषमुक्त फळपीक उत्पादनावर भर दिला आहे. फळ काढणीआधी ते साधारण दीड ते दोन महिने कोणती फवारणी घेत नाहीत. शेणखत, गोमूत्र यांचा वापर वाढावा यासाठी देशी गोपालन सुरु केले आहे. सध्या त्यांच्याकडे दहा गायी आहेत. दुधाची विक्री न करता कुटुंबाला लागणारे दूध वगळता उर्वरित वासरांना देण्यात येते. शेतीत घरातील चार सदस्य सातत्याने शेतात राबतात. याशिवाय पंधरा ते वीस मजूर तसेच चार सालगडी सहकुटुंब कामाला आहेत. त्यातून मजूरटंचाईची समस्या कमी केली आहे. सन २०१७ साली कृषी विभागाच्या मदतीने चार लाख कोटी लिटर क्षमतेचे शेततळे दीड एकरांवर उभारले आहे. सर्वच पिकांना ठिबकचा वापर करण्यात येतो. सध्या सहा विहीरी आहेत. नव्याने २० एकरांवर सीताफळ व अडीच एकरांत गुजराती केशर आंबा लागवडीचे नियोजन केले आहे. या परिसरात पहिल्यांदाच पांढऱ्या जांभूळ लागवडीचा प्रयोग दीड एकरांवर करण्यात येणार आहे. त्यासाठी नीलेश यांनी थायलंडला भेटही दिली आहे. या जांभळाचे उत्पादन तुलनेने कमी वर्षांत येते असे नीलेश सांगतात. रेड बॉल ॲपल या नव्या संकरित बोरांच्या लागवडीचे नियोजनही अडीच एकरांवर केले आहे. शंपर्कः नीलेश शेवाळे, ९४२३७८८५८२