‘वाडा कोलम’साठी शेतकरी आले एकत्र...

‘वाडा कोलम’साठी शेतकरी आले एकत्र...
‘वाडा कोलम’साठी शेतकरी आले एकत्र...

पुणे ः वाडा कोलम ही पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड परिसरातील भाताची पारंपरिक जात. परंतु गेल्या काही वर्षांत सुधारित आणि संकरित भात जातींच्या प्रचारामुळे वाडा कोलम ही जात मागे पडली. परंतु वाडा कोलमची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि जगभरात असलेली मागणी लक्षात घेऊन वाडा तालुक्यातील भातउत्पादकांच्या वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळाने या जातीला पुन्हा मानाचे स्थान मिळवून देण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने शेतकरी मंडळाने वाडा कोलम जातीचे लागवड क्षेत्र त्याचबरोबरीने खात्रीशीर बियाण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे.

याबाबत माहिती देताना सांगे (ता. वाडा, जि. पालघर) येथील कृषिभूषण शेतकरी अनिल पाटील म्हणाले, की काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील भारतीय मित्रांच्या बरोबरीने चर्चा करताना असे समजले, की तेथील भारतीयांमध्ये वाडा कोलम तांदळाला चांगली मागणी आहे. आम्ही मुंबईमधील मॉलमध्येही वाडा कोलम तांदळाची पॅकेट्स बघितली. त्यामध्ये असे दिसले, की हा तांदूळ तेलंगणा राज्यातील भात गिरणीत पॅकिंग झाला आहे. वाडा कोलम ही महाराष्ट्रातील भाताची जात, पण ग्राहकाला वेगळाच तांदूळ मिळतोय. देश, विदेशातील बाजारपेठेत वाडा कोलम तांदळाची मागणी लक्षात घेऊन आम्ही या जातीला पुन्हा एकदा लागवडीखाली आणायचे ठरविले आहे.

आजही वाडा, विक्रमगड तालुक्यातील शेतकरी वाडा कोलम जातीची लागवड करतात. परंतू हेक्टरी केवळ तीन टन उत्पादन असल्याने या जातीच्या लागवडीचे क्षेत्र कमी होत गेले. काही शेतकऱ्यांनी ही जात सांभाळून ठेवली आहे. शेतकरी मंडळातर्फे वाडा तालुक्यातील देवळी, मानिवली, सोनाळे आणि विक्रमगड तालुक्यातील शीळ, झाडपोली, कावळा, माला आणि मालवाडा या गावातील शेतकऱ्यांशी संपर्क करून वाडा कोलम जातीची माहिती घेऊन जातिवंत बियाणे गोळा केले.

आता आम्ही या जातीचे शुद्ध बियाणे गोळा करून त्‍याचा शास्त्रीय अभ्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत. त्यातून शुद्ध बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी बाएफ संस्थेतील पारंपरिक भातजातीचे अभ्यासक संजय पाटील यांची मदत मिळाली आहे. या उपक्रमासाठी आम्हाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी देखील मदत केली आहे. आम्ही कृषी विभागाबरोबरीने वाडा कोलम जातीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

असा आहे वाडा कोलम भात याबाबत अनिल पाटील म्हणाले, की ही जात पाण्याचा ताण सहन करते. साधारणपणे १२५ ते १३० दिवसांत तयार होते. तांदूळ मुलायम आहे. पचायला चांगला आहे. याला सुगंध नाही, पण एक वेगळी चव आहे. तांदूळ साठवणुकीत दोन वर्षे टिकतो. हेक्टरी तीन टन उत्पादन मिळते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र, रासायनिक खतांचा वापर केला तर ही जात लोळते. रोगास बळी पडते. त्यामुळे सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्‍यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com